15 May, 2017

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय
            हिंगोली, दि. 15: राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे रोजी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी दिली आहे.
            राज्यात तापाच्या साथीमध्ये प्रामुख्याने डेंगी, चिकुणगुणीया रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. डेंगू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. सदर डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त साठवुन ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालून अंड्याचे रुपांतर डासात होते. त्याअनुषंगाने कोणतेही साठवलेले पाणी 8 दिवसापेक्षा जास्त ठेवू नये ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
            सध्या उन्हाळा सुरू आहे. राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाण्याचा तुटवडा असल्याने पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने नागरिकांची पाणी साठवण्याची प्रवृत्ती आढळून येणे नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने अशा साठवलेल्या पाण्यात एडीस एजिप्टाय डास अंडी घालून डासोत्पत्ती होते. या डासाची उत्पत्ती कमी करणे/नियंत्रणात ठेवणे यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. लोक सहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही. राष्ट्रीय डेंग्यू दिन दि. 16 मे, 2017 रोजी डेंग्यू विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रिय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाव्दारे नागरिकांपर्यत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
            केंद्र शासनाने डेंग्यू विषयावर मोबाईल ॲप्लीकेशन तयार केलेले आहे. त्याचप्रमाणे ॲन्ड्राईड मोबाईलवर PLAY STORE मध्ये जावुन India Fights Dengu हे ॲप शोधावे व मोबाईलवर ते डाऊनलोड करुन घ्यावे. यामध्ये डेंग्यूविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे. या ॲपचा प्रचार आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सर्व जनतेत होईल असे पाहावे. यामध्ये पत्रकार परिषद, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक सभा, जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण, तालुकास्तर सभा, सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन, ग्रामसभेचे आयोजन, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन, हस्तपत्रिका वाटप, आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन, कंटेनर सर्व्हेक्षण, सर्व स्तरावर स्वच्छता मोहिमेचे आयोजन, दिंडीचे आयोजन, डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्याचा धडक कार्यक्रम सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांनी फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण व एक दिवस कोरडा पाळणे याविषयी जनजागृती जनतेमध्ये निर्माण करणे.
            सदरील राष्ट्रीय डेंग्यू दिन यशस्वी होण्यासाठी लोकप्रतीनिधी सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांचा लोकसहभाग घेऊन गांवपातळीवर राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात यावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी आवाहन केले आहे.
            नागरिकांनी पुढील मुद्याबाबत अवगत करणे आवश्यक आहे : डेंग्यू, चिकूनगुनिया बाबतचे लक्षणे, उपचार उपाययोजना, शासकीय योजनांची माहिती, शासकीय योजना बरोबर जनतेच्या सहकार्याची आवश्यकता, डासोत्पत्ती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तीगत सुरक्षेंतर्गत मच्छरदाण्यांचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी विविध उपाय इत्यादी, कोरडा दिवस पाळून किटकजन्य आजार डेंग्यू, चिकुनगुनिया आजारावर नियंत्रण ठेवण्यास जनतेने सहकार्य करणे याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

*****  

No comments: