21 April, 2018

नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे- अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार






नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे महत्त्वाचे
                                                          अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार
       हिंगोली,दि.21: नागरिकांना सेवा देतांना सामाजिक बांधिलकी जोपासणे अतिमहत्त्वाचे असून, प्रशासकीय कामे पार पाडतांना जबाबदारीचे भान जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार यांनी केले.               
                जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित नागरी सेवा दिन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर यांची उपस्थिती होती.
                राज्याच्या, देशाच्या विकासात प्रशासकीय यंत्रणेचे मोठे योगदान आहे. दैनंदिन प्रशासकीय कामकाज पार पाडतांना मानवी आस्था जपणे खुप आवश्यक आहे. उदारीकरणाच्या धोरणाचा स्विकारल्यानंतर नागरी विकासाच्या अनुषंगाने प्रशासनाचे स्वरुपही बदलले आहे. लोककल्याणकारी राज्याची संकल्पनाही बदलली आहे. शिक्षण आणि नागरिकांना झालेल्या अधिकारांची जाणीव यामुळे परस्थिती बदलली आहे. यापुढे प्रशासनातील विविध घटकांना नागरिकांना सेवा देण्याचे दायित्त्व स्विकारावेच लागणार असल्याचे अप्प्र जिल्हाधिकारी मिणीयार यांनी सांगितले.
                तसेच या दिनानिमीत्त नागरिकांना कोणत्या विभागामार्फत कोणत्या सेवा दिल्या जातात याचीही माहितीही करुन घेता येते. ग्राम स्वराज्य योजना आणि ग्राम विकास परिवर्तत अभियान याबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.
                उपजिल्हाधिकारी श्री. बोरगावकर म्हणाले की, २१ एप्रिल १९४७ रोजी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीच्या मेटकाफ हाऊस येथे भारतीय प्रशासकीय सेवेतील पहिल्या तुकडीतील अधिकाऱ्यांना संबोधित केले होते. त्यानिमित्त नागरी सेवा दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. ‘नव्या भारताची उभारणी’ हे या दिनाचे घोषवाक्य होय. सर्व नागरिकांना सामाजिक, अर्थकि व राजनायीक समान अधिकारी प्राप्‍त आहेत. कायदेमंडळ, न्यायपालीका, कार्यकारी मंडळ हे शासनाचे मुख्य तीन अंग आहेत. प्रशासकीय सुधारणासाठी प्रशासकीय सुधारणा आयोगाची स्थापना केलेली आहे.
                नागरिकांची सनदीनुसार नागरीक हा ‘राजा’ आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण या प्रशासकीय सेवेत काम करीत आहोत. त्याकरीता शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देणे या दिनाचा मुख्य उद्देश होय. आजही अनेकांना आपल्या कर्तव्य आणि शिस्त नियमांची जाणीव नाही. शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब होणे अपेक्षित आहे. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळ देखील माहिती नाही. शासकीय कर्मचारी यांची कार्यालयीन वेळ ही सकाळी 9:45 असून, सदर कर्मचारी 9:55 नंतर कार्यालयात आल्यास त्यास लेट मस्टर मध्ये स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. तसेच 3 वेळेस उशीरा आल्यास 1 दिवसाची किरकोळ रजा घेणे हा नियम आहे. परंतू याबाबत अनेकजण अनभिज्ञ आहेत. प्रशासकीय यंत्रणेवर अनेक महत्वाची सेवा पुरविण्याचे कामे सोपविण्यात आले असून या सेवा नागरिकांना देण्यासाठी कालमर्यादा निश्चित केलेली आहे. त्याकरीता प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली कामे अचूक व वेळत पार पाडण्याचा प्रयत्न करावा असेही श्री. बोरगावकर यावेळी म्हणाले.
        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसीदार श्री. मिटकरी यांनी केले. यावेळी विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.
****

No comments: