08 April, 2018


समाजात समता, स्वातंत्र्य व बंधुत्व रूजवीण्याचा प्रयत्न करावा
                                                    - आमदार तान्हाजी मुटकुळे

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन*

          हिंगोली,दि.8: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले असून, सर्व नागरिकांनी समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केले.
            येथील सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटन आमदार मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पोलीस उपअधिक्षक (गृह) श्रीमती सुजाता पाटील, जात पडताळणी उपायुक्त भारत केंद्रे, जात पडताळणी समिती सदस्य सचिव श्रीमती छाया कुलाल, दलितमित्र संघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार, मधुकर मांजरमकर, बबन मोरे, बबन शिखरे, दत्ताराव पाटोळे आणि समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण उपस्थित होते.
            श्री. मुटकुळे पुढे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणे व गांभीर्याने नमुद केली आहे. कलम 46 मध्ये ‘राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्यायावर सर्वप्रकारचे शोषण या पासून त्यांचे सरंक्षण करील’ असे नमूद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दलित समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना समानतेचा हक्क प्राप्त करुन दिला आहे.  नागरिकांनी समाजातील सर्व व्यक्तींना समतेची वागणूक देवून समाजात एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. समाजाचे मागासलेपण हे अज्ञानामुळे आहे हे ओळखूनच त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून दिले. अनुसूचित जाती व सर्वप्रकारचे पिडित, शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. या सप्ताहच्या निमित्त शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविल्यास त्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती होण्यास मदत होईल, असेही श्री. मुटकुळे यावेळी म्हणाले. 
            यावेळी पोलीस उपअधिक्षक (गृह) श्रीमती सुजाता पाटील, बबन शिखरे आणि दलितमित्र संघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार  यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविकात समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण म्हणाले की, राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले असून, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलभूत अधिकाराची जाणीव असणे आवयश्यक असून जीवनात प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी याकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे संचालन श्री. इंगोले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. वागतकर यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, सर्व महामंडळाचे अधिकरी-कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*****

No comments: