01 September, 2022

 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार

सहभागी होणाऱ्या मंडळासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट, 2022 रोजीपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार देण्यासाठी निवड करण्याची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे.

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतेलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.   

पुरस्कार निवडीसाठी निकष :

मूर्ती  पर्यावरणपूरक असावी. सजावट पर्यावरणपूरक म्हणजेच यात थर्माकोल, प्लॅस्टीक आदी साहित्य असता कामा नये. गणेश मंडळाचे वातावरण ध्वनीप्रदुषण रहित असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा / सजावट असावी. स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भातील देखावा / सजावट याला अधिक गुण दिले आहेत. रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबीर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत केलेल्या कार्याचे मूल्यमापन होईल. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत मंडळाचे कार्य असावे. पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम / स्पर्धा, पारंपारिक / देशी खेळाच्या स्पर्धा याचबरोबर गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा यात पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त याबाबी प्राधान्याने गुण देताना विचारात घेतल्या जाणार आहेत. अर्ज करताना कोणतेही शूल्क आकारण्यात येणार नाही.

वरील बाबींची पूर्तता करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांने परिशिष्ट अ मध्ये अर्ज करावयाचा आहे. तसेच राज्य शासनाचे संकेतस्थळ www.maharashtra.gov.in , पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर व दर्शनिका विभागाच्या https://mahagazetters.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. विहित नमुन्यातील अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेल वर दि. 02 सप्टेंबर, 2022 पर्यंत दाखल करता येतील. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ विजेत्यांची निवड करण्यासाठी शासन निर्णयातील निकषाच्या आधारे कार्यवाही करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास आघाव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कुरमुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही निवड समिती गणेशोत्सव उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन व्हिडिओ व आवश्यक कागदपत्र गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त करुन घ्यावेत. या समितीने प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत दिलेल्या निकषानुसार गुणांकन करुन त्यातील एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची संबंधित कागदपत्रे, व्हिडिओ व गुणांकन राज्य समितीकडे दि. 13 सप्टेंबर, 2022 पर्यंत सादर करावीत.

जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या 36 गणेशोत्सव मंडळामधून विजेते निवडण्यासाठी राज्यस्तरावर समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये सर जे.जे. कला विद्यालयाचे अधिष्ठाता/वरिष्ठ प्राध्यापक, पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ गट-अ मधील अधिकारी यांचा समावेश आहे.

राज्यस्तर समिती ही जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येकी एक याप्रमाणे 36 शिफारस प्राप्त गणेशोत्सव मंडळामधून गुणांकनाच्या अधारे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांची निवड करतील, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.     *****

No comments: