24 February, 2025

प्रधानमंत्री यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण

हिंगोली (जिमाका), दि. 24 : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे प्रधानमंत्री यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण कार्यक्रम ऑनलाईन प्रणालीद्वारे संपन्न झाला. या किसान सन्मान कार्यक्रमास प्रधानमंत्री यांनी भागलपूर बिहार येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता वितरण करून सर्वांना संबोधित केले. या कार्यक्रमास हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन करावे व सध्या सुरु असलेल्या ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आपले ओळखपत्र तयार करून घ्यावे. शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे विशेष लक्ष देऊन फळबाग लागवडीचे नियोजन करावे. प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेमध्ये नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी पीएम किसान योजनेचा कार्यक्रम विविध भाषेमध्ये प्रसारित होत असून सर्व शेतक-यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व कृषि विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनामधील सर्व स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन केले. संत नामदेव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव माने यांनी पी.एम. किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांनी आर्थिक मदत होऊन हा निधी शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी उपयुक्त होत आहे. सद्यस्थितीत भारत देश हा डिजिटल युगाकडे वळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नाविन्य पूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन केले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी ॲग्रीस्टॅकवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख पत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन केले व कृषि विज्ञान केंद्राचे सर्व स्टॉलमध्ये शेतकऱ्यांनसाठी उपयुक्त माहितीचे प्रदर्शन लावण्यात आले आहेत याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये प्रगतशील शेतकरी गोरखनाथ हाडोले, आनंदराव साळुंखे, प्रभाकर मगर, बेलअप्पा नरडेले, गंगाधर राऊत, प्रल्हाद देवकते, आबासाहेब कदम, अशोकराव कदम, अमोल बोबडे, सौ. वंदना थोरात, केरबा मस्के यांचा मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कृषि विज्ञान केंद्राची उद्दीष्ट आणि कार्यपद्धती घडीपत्रिकेचे विमोचन सुद्धा करण्यात आले. या कार्यक्रमास तोंडापूर कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधुरी कटकर, तोंडापूर शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कदम, कळमनुरीचे तालुका कृषि अधिकारी एम. वी. कुंभार, कळमनुरीचे मंडळ कृषि अधिकारी नितीन घुगे, आखाडा बाळापूरचे मंडळ कृषि अधिकारी एस .एस. निंबाळकर उपस्थित होते. या कार्यक्रमा अंतर्गत कृषि विज्ञान केंद्राचे विविध विभाग कृषि विद्या, उद्यान विद्या, पिक संरक्षण, गृह विज्ञान, कृषि विस्तार, मृदा विज्ञान, पशु विज्ञान विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच विविध बचत गट, गांडूळ खत निर्मिती व कृषि महाविद्यालय तोंडापूरचे स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय ठाकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल ओळंबे यांनी केले. या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील सरपंच, अनेक गावातील शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट प्रतिनिधी, कृषि सखी, ग्रामीण युवक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

No comments: