28 February, 2025

जनतेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा - मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जनतेला भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांनुसार जिल्ह्यात देण्यात येणाऱ्या सेवांचा आढावा आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी नुकताच ऑनलाईन बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागाचे आयुक्त किरण जाधव, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, महाआयटीचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्य आयुक्त श्री. श्रीवास्तव म्हणाले, जिल्ह्यातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे काम चांगले असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत ऑनलाईन सेवा देण्याची कार्यवाही करावी. विशेष मोहीम राबवून सर्व विभागाची कार्यालयीन तपासणी सुधारित नमुन्यात करुन उणिवांची पूर्तता करुन अहवाल सादर करावा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमाची जनमाणसात प्रचार, प्रसिध्दी होण्यासाठी जिल्हा कार्यालयाच्या परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी डिजिटल बोर्ड आणि तालुका कार्यालयाच्या परिसरात सूचनाफलक लावावेत. जिल्ह्यातील सर्व विभागाच्या संकेतस्थळावरील मुख्य पृष्ठावर ठळक दिसेल, असे राज्य सेवा हक्क आयोग व सेवा हक्क कायद्याविषयी माहिती प्रदर्शित करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कायद्याविषयी सूचना फलक, देण्यात येणाऱ्या सेवा, त्याचा कालावधी, अधिकाऱ्यांचे नाव व पद असलेले फलक लावावेत. सर्व विभाग प्रमुखानी युजर आयडी व पासवर्ड तयार करुन घ्यावा. तसेच सर्व सेवा आपले सेवा पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी व महाआयटीच्या जिल्हा समन्वयाशी संपर्क साधून कार्यवाही करावी. दि. 28 जानेवारी, 2025 च्या शासन निर्णयातील निकषानुसार आपले सरकार सेवा केंद्राबाबत कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक तालुक्यात 20 आदर्श आपले सेवा केंद्र स्थापन करावेत. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राची अधिकारी नेमून तपासणी करण्यात यावी. तसेच या केंद्रावर तक्रारपेटी उपलब्ध करावी. तक्रारपेटी वेळोवेळी उघडून आलेल्या तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. 90 टक्क्यापेक्षा कमी प्रकरणे विहित कालावधीत निकाली काढली नसल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करावी. विहित कालावधीत प्रकरणे निकाली निघण्यासाठी दर आठवड्याला आढावा घ्यावा, अशा सूचना केल्या. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत येणाऱ्या आपल्या विभागाच्या अधिसूचित सर्व सेवा 1 एप्रिल, 2025 पासून ऑफलाईपन पद्धतीने न देता आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने द्यावेत. या कामात हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत हयगय गेल्यास शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करावी. जिल्ह्यात रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती देणारे डिजिटल बोर्ड लावावेत. तसेच क्यूआर कोड देखील उपलब्ध करुन द्यावा. सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा जिल्ह्याच्या धरतीवर सेवा दूत पथदर्शी प्रकल्प राबवावा. राज्यसेवा हक्क आयोग आयुक्तांना दरमहा लोकशाही दिनी होणाऱ्या बैठकीला आमंत्रित करण्यात यावे. शक्य झाल्यास ऑनलाईन व्हीसीद्वारे आमंत्रित करावेत. आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या डिजिटल प्रमाणपत्रावर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचा लोगो आणि आपली सेवा आमचे कर्तव्य हे ब्रिदवाक्य याचा समावेश करावा, अशा सूचनाही श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांनी त्यावेळी दिल्या. तसेच त्यांनी हिंगोली जिल्ह्याचे काम चांगले असल्यामुळे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांची वेळोवेळी व्हीसीद्वारे बैठका घेऊन लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करुन त्रुटीची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या ऑनलाईन बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. *****

No comments: