01 February, 2025

शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे-- उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड

हिंगोली (जिमाका), दि. ०१ : सध्याच्या काळात पारंपारिक शेती ही परवडणारी नसून शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी. रेशीम शेतीमुळे प्रति एकरी कमीत कमी एक लाख रुपये उत्पन्न मिळण्याची हमी मिळेल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी रोहयो अनिल माचेवाड यांनी रेडगाव येथे केले. महा रेशीम अभियान अंतर्गत रेशीम शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच शासनाच्या नरेगातील इतर योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड उपस्थित होते. यावेळी कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे, रेशीम विकास अधिकारी प्रमोद देशपांडे, रेशीम विकास अधिकारी पुंडलिकराव नरवाडे, तालुका कृषी अधिकारी महादेव कुंभार, गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे, प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे उपस्थित होते. यावेळी बोलताना माचेवाड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना रेशीम शेती सध्याच्या काळात कशी फायदेशीर आहे याचे स-प्रमाण पटवून दिले. रेशीम शेती आणि पारंपारिक शेतीमधील फरक सांगताना म्हणाले, रेशीम शेतीमध्ये दरवर्षी खर्च करायची गरज नसते. एकदा लागवड केल्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा वर्षे तीच लागवड चालते. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचा लागवडीसाठी होणारा खर्च वाचतो. तसेच पाऊस कमी किंवा जास्त झाला तरी रेशीम शेतीवर फारसा परिणाम पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे किंवा अतिवृष्टीमध्ये झालेले नुकसान टाळण्यासाठी रेशीम शेती हा सक्षम पर्याय आहे. तसेच सध्याच्या काळात पिकांचे भाव हा प्रश्न फार गंभीर झालेला आहे परंतु कोशाचे दर सध्याला 60 ते 70 हजार रुपये क्विंटल असल्यामुळे हा सुद्धा प्रश्न दूर होतो. यासाठी शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवड करावी लागते. त्यानंतर कीटक संगोपन गृह बनवावे लागते. कीटक संगोपन गृह बनविल्यानंतर शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी दोन तर दुसऱ्या वर्षीपासून पाच ते सात पिके घेता येतात. एका पिकांमध्ये कमीत कमी 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी कमीत कमी लाख ते दीड लाख रुपये एकरी उत्पादन होत असते. तसेच शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून रेशीम शेतीसाठी तीन वर्षांमध्ये 4 लाख 18 हजार रुपयांचे अनुदान सुद्धा मिळते. वरील प्रमाणे फायदे मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री. माचेवाड यानी याप्रसंगी केले . येणाऱ्या काळात शेतीला पारंपारिक पिकाशिवाय रेशीम शेती सारख्या पिकाची गरज असून सर्व शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून स्वतःचा आर्थिक स्तर उंचवावा, असे आवाहन यावेळी सर्व उपस्थित अधिकारी यांनी केले. या कार्यक्रमासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तांत्रिक अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आणि जवळपास 300 ते 400 शेतकरी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

No comments: