02 December, 2019

समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याणाकरिता विविध योजना


समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याणाकरिता विविध योजना

            हिंगोली, दि.2 : जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, हिंगोली कार्यालयाकडून दिव्यांग कल्याणाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात- सदर योजनांची माहिती खालील प्रमाणे आहे.
व्यंग अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान योजना- सदर योजनेतंर्गत एखादया दिव्यांग व्यक्तीसोबत सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास अशा जोडप्यास प्रोत्साहनपर अनुदान म्हणून विभागाकडून रु.25000/- रोख व रु.25000/- चे राष्ट्रीय बचत पत्र या स्वरुपात अनुदान देण्यात येते. दिव्यांग जनांसाठी बीज भांडवजल योजना- सदर योजनेतंर्गत दिव्यांग व्यक्तींना लघुउदयोगासाठी बॅकेमार्फत रु.150000/- च्या मर्यादेत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सदर मंजुर कर्जाच्या एकूण रकमेवर 20 टक्के सबसीडीची रक्कम विभागाकडून बॅकेस अदा केली जाते. 5 टक्के दिव्यांग कल्याण निधी - सदर योजनेतंर्गत प्रत्येक आर्थीक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या स्वउत्तपन्नाच्या 5 टक्के एवढा निधी हा दिव्यांग कल्याण करिता राखून ठेवण्यात येतो. सदर निधीमधून दिव्यांग व्यक्तींना स्वंयरोजगारासाठी विविध साहित्य खरेदी साठी 100 टक्के अनुदान देण्यात येते. शालांतपूर्व शिक्षण घेणा-या दिव्यांग विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती - सदर योजनेतंर्गत इ.1 ते 10 वी पर्यंत शिक्षण घेणा-या दिव्यांग विदयार्थ्यांना शासनाकडून दिव्यांगांच्या प्रवर्गानुसार शिष्यवृत्तीचे विदयार्थ्यांच्या बॅकखातेवर अनुदान जमा करण्यात येते. तरी  वरील योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांग बंधूनी लाभ घेणेबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी आवाहन केले आहे.
000



ओल्या दुष्काळातही रेशीम शेतीने तारले






ओल्या दुष्काळातही रेशीम शेतीने तारले

हिंगोली, दि.2: संपूर्ण राज्यात ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले. परंतू रेशीम शेती याला अपवाद ठरली हिंगोली जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांनी या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
वसमत तालूक्यातील पांगरा शिंदे या गावातील रेशीम शेतकरी श्री. सुशील रावसाहेब शिंदे यांनी जुलै 2019 ते नोव्हेंबर 2019 या पाच महिन्याच्या कालावधीत चार वेळा एकूण 750 रेशीम आणि त्याचे संगोपन करून 708 कि.ग्रॅ. रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन या चार पिकाद्वारे 2 लाख 48 हजार 306 रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
याप्रकारे जिल्ह्यातील सुमारे 50 रेशीम शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत अवघ्या 5 महिन्याच्या कालावधीत 1 लाखाहून अधिक रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. तसेच 140 शेतकऱ्यांनी 50 हजार रुपयापेक्षा जास्त उत्पन्न घेऊन रेशीम शेतीने प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतकऱ्यांना संजीवनी देणारी उत्तम जोड व्यवसाय असल्याचे सिद्ध केले आहे.
ओल्या दुष्काळात पारंपारिक पिकांप्रमाणे रेशीम शेतीचे कुठलेही नुकसान होत नसून वाढलेल्या आर्दतेचा चांगला परिणाम कोष उत्पादनावर होवून चांगले उत्पन्न्‍ मिळते. त्यामुळे जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा मार्ग अवलंबून स्वतःची आर्थिक स्थिती बळकट करावी, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी  स्वप्नील तायडे व प्रगतीशील रेशीम शेतकरी सुशील शिंदे यांनी केले आहे.
श्री. सुशील शिंदे यांनी रेशीम शेतीत विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक श्री वडवळे, प्रवीण चव्हाण यांनी सत्कार करून गौरव केला. तसेच इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

****




30 November, 2019

दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताह साजरा होणार · अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या हस्ते आज सप्ताहाचे उद्घाटन





दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताह साजरा होणार
·         अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या हस्ते आज सप्ताहाचे उद्घाटन

हिंगोली, दि.30: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताह दिनांक 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2019 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात अप्प्र जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भुसंपादन उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, सहायक गट विकास अधिकरी बोथीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (एस.व्ही.एस.टी) पुरुषोत्तम कुटे आणि या योजनेचे  जिल्हास्तरीय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी असंघटीत कामगार गजानन पवार यांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.
00000

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील लाभार्थ्यांनी त्यांचा डाटा 30 नोव्हेंबर पर्यंत आधार लिंक करण्याचे आवाहन


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधील
 लाभार्थ्यांनी त्यांचा डाटा 30 नोव्हेंबर पर्यंत आधार लिंक करण्याचे आवाहन

हिंगोली, दि.30: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची माहिती आधार संलग्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील 4 हजार 116 शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 104 लाभार्थ्यांना मान्यता देऊन 4 हजार सात शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेमधील लाभार्थी यांचा डाटा आधार लिंक नसल्यामुळे बरेच लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकत असल्याने केंद्र शासनाने सदरची बंधनकारक असलेली अट लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक करण्यासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2019 अखेर पर्यंतच शिथील केली आहे. त्यानंतर याबाबत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही . तसेच या योनजेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवर फार्मर्स कॉर्नर मध्ये फार्मर रजिस्ट्रेशन ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, सर्व लाभार्थ्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत डाटा आधार लिंक करुन घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी  केले आहे.
0000

29 November, 2019

एड्सची माहिती जाणा आणि एड्स टाळा


विशेष लेख                                           दिनांक : 29 नोव्हेंबर, 2019
                                                      
एड्सची माहिती जाणा आणि एड्स टाळा

हिंगोली, दि.29: 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून पाळला जातो. या आजाराबाबत जनजागृतीचे प्रतिक म्हणून लाल रंगाची फित हे प्रतिनिधिक चिन्ह आहे. एचआयव्हीचा संसर्ग ही  जागतिक पातळीवरची समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणातून, असे लक्षात आले या आजारामुळे 3.5 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे योग्य वेळी एड्सची माहिती घेऊन हा आजार टाळू शकतो.
हा आजार 1980 च्या दशकात प्रथम माकडामध्ये आढळला. पुढे त्याची लागण पसरायला सुरूवात झाली. एच.आय.व्ही.ची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उदभवतो का? या सगळया प्रश्नांवर अनेक माध्यमांव्दारे प्रचार झाल्याने  नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. तरी सुध्दा आजही अंधश्रध्दा आणि गैरसमजुतींना समाजातून काही लोक खतपाणी घालत आहे. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे.
डब्ल्यु.एच.ओ यांनी केलेल्या सर्वेक्षणात लक्षात येते की,भारतात या आजाराचा प्रसार 2005 सालापासून होताना दिसतो. तेव्हा आजाराचे प्रमाण 55 लाख होते. त्या तुलनेत 2007 साली 25 लाख होती म्हणजे 50 टक्के घट झाल्याचे आढळून आले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सर्वेक्षणानुसार गेल्या 10 वर्षात भारतात जनजागृती झाल्यामुळे हे प्रमाण घटण्यास सुरूवात झाली. 2011 साली झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात या रोगाबाबत योग्य जागरूकता निर्माण झाल्यामुळे 50 टक्के प्रमाण घटल्याचे दिसते.  2017 साली झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात महाराष्टात प्रमाण अधिक आहे. यात 3.30 लाख इतके रूग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ आंध्रप्रदेश 2.70 लाख, कर्नाटक 2.47 लाख, तेलंगाना 2.04 लाख, वेस्ट बंगाल 1.44 लाख, तमिळनाडू 1.42 लाख, उत्तरप्रदेश 1.34 लाख रूग्ण आहेत. येणा-या काळात एड्समुक्त भारत करण्याचे प्रयत्न केले जात आहे.  त्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असणे आवश्यक आहे.
एड्स आजाराचे टप्पे 
मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे निर्माण होणा-या आजार लक्षणांचा समूह म्हणजे एड्स होय. एड्स म्हणजे अॅक्वायर्ड- संपादित केलेला, इम्यूनो- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, डेफिशियन्सी – कमतरता, सिंड्रोम – लक्षण समूह होय. एच. आय. व्ही. विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर आजाराची लक्षणे दिसायला सुरूवात होते.  त्याचा परिणाम काही आठवडे राहतो. एच.आय.व्ही संक्रमित व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसते. हा कालावधी 3 महिने ते १५ वर्षेपर्यंत असू शकतो. ते व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर अवलंबून असतो.

एड्स झाल्याचे केव्हा समजते?
एच.आय.व्ही.चा विषाणू शरीरात रोगप्रतिकारक संस्थेच्या पेशीवर हल्ला करून त्या नष्ट करण्यास सुरूवात करतो. नष्ट झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी वेगाने निर्माण होत नाही. या पेशींच्या कमतरतेमुळे बाधित व्यक्ती क्षयरोग, कँडिडियासीस, नागीण आदी विविध संक्रमणांमुळे होणा-या  आजाराचे बळी पडू शकतात. एच.आय.व्ही. संक्रमणाची अंतिम टप्प्याची म्हणजेच एड्सची सुरुवात येथून होते. तोपर्यंत बाधित व्यक्ती तिस-या अवस्थेपर्यंत पोहोचतो. 

ही आहेत लक्षणे
बाधित व्यक्तीचे वजन कमी होण्यास सुरूवात होते. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ सतत जुलाब होतात. एक महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला येतो. अंगावरील त्वचेवर वारंवार खाज येते. बाधित व्यक्तीच्या तोंडात व घशात फोड येतात. लसिका ग्रंथींची सूज जास्त काळ राहते  ही प्रमुख लक्षणे ज्या व्यक्तीत दिसतात ती एड्सग्रस्त व्यक्ती समजावी.

असा टाळता येतो धोका
एड्स सहज टाळता येऊ शकतो. यासाठी आवश्यक काळजी घेतल्याने एड्स टाळणे प्रत्येकाला शक्य आहे. रक्त घेण्याची वेळ आली तर एच.आय.व्ही. मुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा. इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरीज आणि सुईचा वापर करावा. गुप्तरोग झाला असल्यास डॉक्टरकडे जाऊन त्वरित उपचार करावा. पालकांकडून बाळाकडे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व प्रकारची उपाययोजना करावी. दाढी- कटिंग करताना न्हाव्यालासुद्धा नवीन ब्लेड वापरण्याचा आग्रह करावा. एड्सग्रस्ताचे नेलकटर व ब्लेड वापरू नये, कारण यामुळे एड्स होण्याची शक्यता असते.
योग्य उपचाराला प्राधान्य दयावे
बरेच रुग्ण एड्स झाल्याचे निदान होताच तो लपवून ठेवतात हे योग्य नाही. त्याने घरातील सदस्यांना याबाबत माहिती देऊन योग्य त्या उपाययोजना व उपचार करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. एड्स लपवणे म्हणजे या आजाराची दुस-याला बाधा करणे.
सरकारी दवाखाने, उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी एड्सबाबत समुपदेशन केंद्रे आहेत. तिथे जाऊन आजाराची माहिती घ्यावी. कारण एड्सची माहितीच एड्सपासून बचाव करू शकते. औषध म्हणजे एड्सची पूर्ण माहिती जाणून घेणे. ए.आर.टी. उपचार केंद्रात रुग्णांनी जाऊन जीवनमान सुधारावे. एच.आय.व्ही. एड्ससंबंधी गैरसमजुती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी लोकांना अचूक व संपूर्ण माहिती व प्रबोधनावर अधिक भर द्यावा.

                                                       -अरुण सुर्यवंशी
                                                                  जिल्हा माहिती अधिकारी
                                                हिंगोली

28 November, 2019

विविध शासकीय क्रीडा स्पर्धा योजना



विविध शासकीय क्रीडा स्पर्धा योजना
शारीरिक शिक्षण व खेळ हा शिक्षणाचा अविभाज्य घटक आहे. शालेय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे असलेले क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याची संधी लाभत असते. खेळविषयक प्रशिक्षणात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता वाढते. ही शारीरिक सुदृढता त्यांना भावी जीवनात क्रियाशील राहून रचनात्मक कार्य करण्यास लाभदायी ठरते. खेळामुळे त्यांच्या सांघिक भावना, खेळाडूवृत्ती, आव्हानास सामोरे जाण्याची शक्ती वाढते. याहीपेक्षा खेळाद्वारे विद्यार्थी धर्मभेद, वंशभेद व जातीभेद विसरुन संघटित होवून राहण्यास शिकतात. विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण होते. खेळाद्वारे राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवण्यास महत्वपूर्ण योगदान लाभते. जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, युवती, खेळाडू, क्रीडासंस्था व शैक्षणिक संस्था यांना विविध क्रीडाविषयक माहिती, योजना या विषयीची माहिती मिळावी, यादृष्टीने माहितीचा ऊहापोह करणारा लेख…
शासनाच्या नवीन क्रीडा व युवा धोरणामुळे क्रीडा क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यामुळे खेळाडू व युवकांमध्ये आमुलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. विभागाच्या ठिकाणी विभागीय क्रीडा संकुल, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल, तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल, खुल्या जीमची सुविधा उभारण्यात येत आहे. तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजना, व्यायामशाळा विकास अनुदान योजना, क्रीडा सुविधा अनुदान योजना, युवक कल्याण अनुदान योजनेच्या माध्यमाने स्वयंसेवी संस्था, युवा मंडळे, क्रीडा मंडळे, महिला मंडळे यांना क्रीडा विकासासाठी व युवा विकासासाठी आर्थिक सहाय्यक दिले जाते. त्यामुळे खेळाडूंना खेळांच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थी, खेळाडूंनी व युवकांनी घ्यावा.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान तीन खेळात सहभाग घ्यावा. शासनाच्या वतीने खेळाडूंसाठी व युवक-युवतींसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण, 11 वी प्रवेशासाठी 3 टक्के आरक्षण, शासन सेवेत नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण, शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात येतात. युवकांकरिता युवक युवती प्रशिक्षण शिबीर, स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबीर, युवा महोत्सव, युवा दिन, युवा सप्ताह, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, सायकल शर्यत, मॅरेथॉन अशा विविध स्पर्धांचे आयोजन शासनातर्फे करण्यात येते.
शालेय, महानगरपालिका स्पर्धेसाठी नोंदणी शुल्क खालीलप्रमाणे असते.
  • शाळेची एकूण पटसंख्या 500 पेक्षा कमी- 250 रूपये
  • शाळेची एकूण पटसंख्या 500 पेक्षा जास्त- 350 रूपये
प्रवेश फी खालीलप्रमाणे असते.
सांघिक खेळ प्रति खेळ (वयोगटनिहाय वेगवेगळे)- 50 रूपये (मुले व मुली स्वतंत्र)

वैयक्तिक खेळ (प्रति खेळ बाब)- 25 रूपये (मुले व मुली स्वतंत्र)

खेळनिहाय क्रीडा प्रकार
मैदानी खेळ

रोप स्किपिंग, फुटबॉल, टेनिस, पिकलबॉल, फील्ड आर्चरी, रस्सीखेच, जम्परोप, कयाकिंग व केनोइंग, वुशू, कराटे, किक बॉक्सिंग, कबड्डी, धनुर्विद्या,गोळा फेक, थाळी फेक, हातोडा फेक, भाला फेक, 100 मी., 200 मी. 400 मी. 600 मी. धावणे, 80 मी. हर्डल, उंच उडी, लांब उडी, 800, 1500, 3000, 5000 मीटर धावणे, 100 मी.हर्डल, तिहेरी उडी, बांबू उडी, 3000, 5000 मी. चालणे, 110 मी.हर्डल, 400 मी. हर्डल, 4X100 मी. रिले, 4X400 मी.रिले, 5 कि.मी. क्रॉसकंट्री, 3 कि.मी. क्रॉसकंट्री.

जलतरण

50, 100, 200, 400 मी. फ्रीस्टाईल, 50, 100, 200 मी. बॅकस्ट्रोक, 50, 100 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक, 50,100, 200 मी. बटरफ्लाय, 200 मी. इंडि.मिडले, हायबोर्ड, हायबोर्ड 1 मी., स्प्रींगबोर्ड 3 मी., 4X100 मी.फ्री रिले, 4X100 मी. मिडले रिले, 800 मी. फ्री स्टाईल, 400 मी.इंडी.मिडले, स्पिंगबोर्ड 1 मी., 1500 मी. फ्रीस्टाईल.

इतर
सिकई मार्शल आर्ट, जिम्नॅस्टिक्स, ज्युदो, कुस्ती, स्केटींग, वेटलिफ्टिंग, तायक्वांदो, रायफल शुटींग, पॉवर लिफ्टिंग, चायक्वांदो (फक्त डिफेन्स ड्रील), तलवारबाजी, जित कुने डो, थांग ता मार्शल आर्ट, योगासन, सीलम्बन, बॉक्सिंग, सायकलिंग.

युवा महोत्सव
केंद्र शासनाच्या वतीने 1994 पासून 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवक-युवतींसाठी युवा महोत्सवाचे जिल्हा, राज्य व राष्ट्रीयस्तरावर आयोजन केले जाते. जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात करण्यात येते. या युवा महोत्सवात माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, युवक मंडळे, महिला, सांस्कृतिक मंडळ तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या 15 ते 35 वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येते. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका (हिंदी-इंग्रजी), शास्त्रीय गायन हिंदुस्थानी शैली, कर्नाटकी शैली, शास्त्रीय वाद्यवादन सोलो तबला, सितार, बासरी, वीणा, मृदंग, गिटार, हार्मोनियम लाईट, शास्त्रीय नृत्य, (मणिपुरी, ओडीसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी), स्वयंस्फूर्त वक्तृत्व (हिंदी-इंग्रजी) या कार्यक्रमांची निवड करण्यात येते.

या कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका, जन्मतारीख, पत्ता, दूरध्वनी क्रमांकासह जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक असते. प्रवेशिकेसोबत वास्तव्याचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. सर्व कला प्रकारातील कलाकारांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
0000000
                                                        -अरुण सुर्यवंशी
                                                                  जिल्हा माहिती अधिकारी
                                                हिंगोली

27 November, 2019

क्रिडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी










क्रिडा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
-जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी

आदिवासी विभागाच्या विभागीय क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन

हिंगोली,दि.27: विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरीता  विविध क्रिडा प्रकार अत्यंत महत्वाचे आहेत. खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होतोच पण बौद्धीक विकास होण्यास देखील मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी यांच्या विद्यमाने अमरावती विभागाअंतर्गत  येणाऱ्या शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांच्या तीन दिवसीय विभागीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त विनोद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, राज्य राखीव बलाचे समादेशक मंचक इप्पर, अकोला जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक (प्रशिक्षण) प्रशांत वाघुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीम फारुकी, माजी सहायक प्रकल्प अधिकारी शंकर राठोड आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प संचालक विशाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता चांगली असते. यामुळे खिलाडूवृत्तीने उत्कृष्ट प्रदर्शन करण्याची त्यांची क्षमता वाखाणण्यासारखी आहे. खेळांचा निरंतर सराव व अथक परिश्रमाची जोड देऊन या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी होण्याचे स्वप्न बाळगावे.
अमरावती विभागाच्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त विनोद पाटील म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासाकरिता त्यांच्यातील क्रीडा कुशलतेचा उपयोग करुन घ्यावा. क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थी जीवनातील यशापयशाला तोंड देण्यास सक्षम होतात. खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याचे तसेच खिलाडूवृत्ती निर्माण करुन पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी  करण्याचे आवाहन केले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची भोजन, वैद्यकीय, सुरक्षा इत्यादी सर्वप्रकारच्या सुविधांची चोख व्यवस्था ठेवण्याची सूचना आयोजकांना दिल्या.
प्रांरभी क्रीडाज्योत प्रज्वलित करून तसेच हवेत फुगे सोडून तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी सर्व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करण्याची शपथ घेतली. तसेच प्रमुख अतिथींना सहभागी खेळाडूंनी मानवंदना दिली. यावेळी कळमनुरी आणि पुसद यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेने या विभागीय क्रिडा स्पर्धेची सुरुवात झाली.
आदिवासी विभाग अमरावती अंतर्गत येणाऱ्या कळमनुरी, किनवट, पांढरकवडा, अकोला, औरंगाबाद, पुसद आणि धारणी अंतर्गत शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांच्या शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

****