10 January, 2023

 

भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी

31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

             हिंगोली (जिमाका), दि. 10 :  सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने दिनांक 6 जानेवारी 2017 च्या शासन निर्णया अन्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहास प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाप्रमाणे निवास, भोजन व अन्य सुविधाअभावी पुढील  शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनु. जाती व नवबौध्द विद्यार्थ्यापैकी 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्याववसायिक अभ्यासक्रमामध्ये जिल्हास्तरावरील महाविद्यालयात / शिक्षण संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामधील मुलां-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य , निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. या याजने अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या अनु.जाती  व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 31 जानेवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

            या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज सादर करावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75 टक्के आवश्यक राहील. विद्यार्थ्यांने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम  पूर्ण न केल्यास अथवा नौकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल.

                  या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना http://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. गरजू विद्यार्थ्यांनी तो संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन  घ्यावा.

अर्ज करण्यासाठी जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहीवाशी असल्याचा पुरावा, आधार कार्डची सत्यप्रत, बँक पासबूक सत्यप्रत, उत्पनाचे प्रमाणपत्र अडीच लाखाच्या आत / फॉर्म नंबर 16, विद्यार्थी दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी, 11 वी, 12 वी व पदवी परिक्षेचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईट, विद्यार्थीनी विवाहित असल्यास पतीचा उत्पनाचा पुरावा, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा, विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, स्थानिक रहिवाशी नसल्याबाबाचते प्रमाणपत्र, विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबातचा पुरावा (खाजगी वसतीगृह, भाडेकरारनामा), महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परिक्षेच्या निकालाची सत्यप्रत आदी कागदपत्राच्या सांक्षाकित प्रती आवश्यक आहेत.

योजनेचे निकष :  विद्यार्थी शासकीय वसतिगृहास प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासकिय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या योजनेसाठी सामाजिक न्यायविभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवोशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेडयूल्ड बँक खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा. (ज्या महाविद्यालय/ शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी महाविद्यालय/ शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालिका / ग्रामपंचायत यांच्या हद्दीत आहे त्या महानगर पालिका / ग्रामपंचायत येथील रहिवाशी नसावा.)  नगर पालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालय/शैक्षणिक संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. विद्यार्थी 11 वी 12 वी आणि त्यानंरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. 10 वी, 11 वी, 12 वी किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी/पदव्युत्तर शिक्षणासाठी लाभ घेता येईल. 11 वी, 12 वी व  प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थ्यांनीच या योजनेसाठी अर्ज करावेत. या योजनेचा पुढे लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास अभ्यासक्रमाचे मागील प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 50 टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन/CGPA असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षापेक्षा कमी नसावा. विद्यार्थ्याची निवड गुणवतेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेमध्ये दिव्यांग (अनु.जाती व नवबौध्द घटकातील ) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. त्यांना गुणवत्तेची  टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. या योजनेसाठी खास बाब सवलत लागु राहणार नाही. विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहास प्रवेशासाठी अर्ज सादर केलेला असावा व शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा.

******

No comments: