11 April, 2025
जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा 15 एप्रिल रोजी शुभारंभ • जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 11 : पाणी व्यवस्थापनाची माहिती लोकांना व्हावी तसेच जलव्यवस्थापनाची मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यादृष्टीने राज्यात जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचे 15 ते 30 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा प्रारंभ मंगळवार, (दि. 15) रोजी होणार आहे.
आज राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दृरदृश्यप्रणालीद्वारे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा पूर्वतयारी आढावा घेतला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अति. मुख्य सचिव दिपक कपूर यांची उपस्थिती होती. या बैठकीस राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच या विषयाशी संबंधित मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिकारी आदीची उपस्थिती होती.
यावेळी जल व्यवस्थापन पंधरवड्यात करण्यात येणाऱ्या कामकाजाचा पूर्व आढावा घेण्यात आला. या जल व्यवस्थापन पंधरवडा कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
15 एप्रिल रोजी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-2025 साजरा करणे व जलसंपदा पंधरवडा प्रारंभ. 16 एप्रिल रोजी जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, 17 एप्रिल रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, 18 एप्रिल रोजी शेतकरी व पाणी वापर संस्था संवाद, 19 एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, 20 एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान, 21 एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारीचे निरसन करणे, 22 एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोधून कार्यवाही करणे, 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पध्दतीबाबत उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक, कार्यशाळेचे आयोजन. 24 एप्रिल रोजी सिंचन-ई-प्रणाली, पाणी दर, पाणी पट्टी आकारणी व वसुली थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा, 25 एप्रिल रोजी विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र, सेवाभावी संस्था यांच्या समवेत संवाद व कृती कार्यक्रम, 26 एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुर्नवापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी येत असल्याबद्दल प्रकरणाचा शोध घेणे, 27 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन, 28 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाच्या नावे संपादित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे, अतिक्रमण निष्कासन 31 मे पूर्वी करणे, 29 एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण, चर्चासत्र व कार्यशाळा, 30 एप्रिल रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा, महिला मेळावा, या पंधरवडा कालावधीत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अभियंत्याचे सत्कार व पंधरवडा समारोप असे कार्यक्रम होणार आहेत.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment