22 April, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला कृषि विभागाचा आढावा
* शेतकऱ्यांनी बी.बी.एफ. व टोकन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उत्पादकता वाढवावी-जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. २२: कृषी विभाग व विविध खत कंपनीच्या प्रतिनिधींनी योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे व खत पुरवठा होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्यासह कृषि व ईतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.गुप्ता यांनी बैठकीदरम्यान खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया व डीएपी या खतांचा संरक्षित साठा व नियोजन याविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच शासनाच्या सुचनेप्रमाणे युरिया व डी.ए.पी खतांचा संरक्षित साठा करण्याच्या नियोजनास मान्यता दिली.
त्याचबरोबर एचटीबीटी कापूस बियाण्यांची अनधिकृत विक्री रोखण्यासाठी पोलीस विभाग, महसूल विभाग व कृषी विभाग यांनी संयुक्तपणे दक्षता घेण्याचे आदेश दिले.अशा बियाण्यांची विक्री निदर्शनास आली, तर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत कलम 15 व 16 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल. यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड, एक वर्षाचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके यासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी त्यांच्या 9421490222 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदवाव्यात. तालुका स्तरावर देखील कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्या अध्यक्षतेखाली अशी केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत.
या बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी बी.बी.एफ. आधारित व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्याचे निर्देश कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांनी बी.बी.एफ. व टोकन तंत्रज्ञानाचा मोठ्या क्षेत्रावर अवलंब करुन उत्पादकता वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी केले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment