07 April, 2025
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिल अंतिम मुदत
हिंगोली (जिमाका), दि. 07 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी रास्तभाव दुकान स्तरावर ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी देशात 100 टक्के ई-केवायसी प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे.
सर्व जनतेनी आपण आपल्या कुटुंबियांसमवेत आपल्या शिधापत्रिकेमधील जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) करून घेणे सक्तीचे आहे. अन्यथा ज्या व्यक्तीचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) होणार नाही त्यांचे शिधापत्रिकेमधून नाव वगळल्यास किंवा त्यांचे शिधा जिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शिधा पत्रिका धारकाची राहील, याची नोंद घ्यावी.
शिधापत्रिका ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय सूचना केंद्र, नवी दिल्ली यांनी मेरा के-वायसी मोबाईल अप्लिकेशन विकसित केले आहे. त्यामुळे लाभार्थी स्वतः त्याच्या मोबाईल मधून केवायसी पूर्ण करू शकणार आहे. सदर मोबाईल प्रणाली राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानांमध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांच्याकरिता मेरा-केवायसी मोबाईल प्रणालीद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी. सत्यापन (व्हेरिफिकेशन) बंधनकारक असल्यामुळे 30 एप्रिल, 2025 पर्यंत ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन तहसीलदार, हिंगोली यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment