15 April, 2025
विशेष लेख : चला, जलजागृतीतून टंचाईवर मात करूया !
राज्यात गेल्या काही वर्षात सतत हवामान बदल होत असून, पृथ्वीतलावरील जीवसृष्टीला कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सजीवांच्या अस्तित्वासाठी पुरेशा स्वच्छ, शुद्ध आणि पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता न झाल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. गेल्या काही काळात नैसर्गिक बदलामुळे पावसाचे प्रमाण व वेळा अनिश्चित झाल्याने पाण्याचे नियोजन करणे अडचणीचे झाले आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन अनेक विविध उपक्रम राबवून जलस्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यात आज दि. 15 ते 22 एप्रिल, 2025 या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाची सुरुवात आज मान्यवराच्या उपस्थितीत हिंगोली तालुक्यातील अंभेरी साठवण तलावाच्या ठिकाणापासून करण्यात आली आहे. या सप्ताहामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासंबंधीचा आढावा या लेखातून घेण्यात आला आहे.
राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासनामार्फत केले जात आहेत. मात्र पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य मिळाल्याशिवाय तो संपणार नाही. त्यासाठी पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, गरजेपुरता वापर करणे, नैसर्गिक जलस्रोत, नद्या व जलाशयाचे प्रदूषण रोखणे, पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे, पाण्यासंबंधी कायदे व नियमांचे पालन करणे याबाबत समाजात जागृती व जलसाक्षरता होण्याची गरज आहे. त्यासाठी सतत विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 22 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक जलदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून प्रतिवर्षी दि. 16 ते 22 मार्च हा सप्ताह संपूर्ण राज्यात ‘जल जागृती सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
या जलजागृती सप्ताहामध्ये राज्यातील पाण्याशी संबंधित प्रशासकीय विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजपासून जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-2025ला सुरुवात झाली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा, महिला मेळावा या पंधरवडा कालावधीत नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जल जागृती सप्ताहमध्ये राज्यस्तरावर, विभागस्तरावर, जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयामार्फत जलजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जलसंपदा विभाग : सिंचनासाठी पाणी वापरासंबंधी कायदे व नियमाबाबत लाभधारकांमध्ये जागृती निर्माण करणे, सिंचन प्रकल्पाची रचना, धरण व कालव्याचे संरक्षण करण्याची गरज, कालवा फुटीच्यावेळी घ्यावयाची दक्षता, सिंचन व्यवस्थापनाच्या शिस्तीचे पालन करणे, पाणी वापर संस्थाचे महत्व व त्याचे फायदे, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता, सूक्ष्म सिंचन पध्दती अंमलात आणण्याची गरज, भूजल व कालव्याच्या पाण्याचा संयुक्त वापराचे नियोजन, कोल्हापुरी बंधाऱ्यांचे सिंचन व्यवस्थापन, बंधाऱ्यात दरवाजे बसविणे व काढण्याचे तंत्र इत्यादीबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचे नियोजन करुन सनियंत्रण करण्यात येत आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग : पारंपारिक प्रवाही सिंचनामध्ये पाण्याची बचत करण्याचे उपाय, सूक्ष्म सिंचन पध्दतीचे फायदे, उपलब्ध पाण्यातून गरजेनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, त्यांना मार्गदर्शन, शासनाच्या विविध उपक्रमाची देता येईल. त्यासाठी जिल्हा, तालुका पातळीवर विविध चर्चासत्रे, बैठका, व्याख्याने, मेळाव्यातून पाण्याची बचत व सूक्ष्म सिंचन पध्दतीचा प्रसार करण्यात येणार आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नगर विकास विभाग : नागरी तसेच ग्रामीण भागात जलजागृती करण्याबाबत उपक्रम विभाग राबविणार असून, ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांचा उद्भव व यंत्रणा कार्यक्षम ठेवण्यासाठी काळजी घ्यावी. टंचाई भागात पाणी पुरवठ्याची व्यवस्था, पाण्याचा काटकसरीने वापर, गल्लोगल्ली व गृहनिर्माण संस्थामध्ये चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित करण्यात आले आहेत. नागरी हद्दीत बांधकाम, उद्याने व स्वच्छतेसाठी भूजलाचा वापर करणे, पावसाळ्यात जलसंवर्धन इत्यादी उपाययोजनेचे महत्त्व स्पष्ट करून मिटरद्वारे पाणीपुरवठा हा पाणी बचतीचा अंतिम उपाय आहे. त्याबाबतचे फायदे व गरज याबद्दल जागृती निर्माण करण्यात येणार असून, सर्वत्र जलजागृती सप्ताहात विविध कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी आहे. प्रादेशिक व ग्रामीण नळ पाणी पुरवठ्याबद्दल गावस्तरावर जिल्हा परिषद हे उपक्रम राबविणार आहे.
पर्यावरण विभाग, उद्योग विभाग : सध्या घरगुती व उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त नासाडी ही नैसर्गिक प्रवाहात मिसळल्याने होणाऱ्या प्रदुषणामुळे होतो. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहाचे प्रदूषण रोखणे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शासन पातळीवरुन याबाबत विविध उपाय योजिले गेले आहेत. तथापि स्थानिक लोकांनी या कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास निश्चितपणे प्रदूषण कमी होऊन नैसर्गिक प्रवाह स्वच्छ राहू शकतील. त्यादृष्टीने पर्यावरण विभागामार्फत लोकजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार असून, प्रदूषण नियत्रंणाबाबत स्वयंसेवी संस्थाही यामध्ये सहभागी होत आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग : शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी निर्माण होत असते. जलसप्ताहाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पाण्याचे महत्त्व, संवर्धन, पाण्याची गुणवत्ता याविषयी जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय स्तरावर याविषयी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, जलदिंडीच्या माध्यमातून नदी, जलशुद्धीकरण प्रकल्पांना भेटी आयोजित करण्यात येणार आहेत.
ग्रामविकास व जलसंधारण विभाग: ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत जलयुक्त शिवार व जल साक्षरता उपक्रम पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपक्रम हाती घ्यावेत. विहीर, विंधन पुन:र्भरण यांची प्रात्यक्षिके ग्रामपातळीवर आयोजित करावी. जलसंधारणाची कामे, जलयुक्त शिवार प्रकल्पांना भेटी व शिवार फेरीसारखे कार्यक्रम आयोजित करावेत. प्रत्येक गावात जललेखाचे वाचन करावे. त्याची माहिती नागरिकांना द्यावी. गावाचा जललेखा ही संकल्पना जनतेत रुजविण्याचे काम करणे अपेक्षित आहे.
जल जागृती सप्ताहाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदेशाने झाला असून, जिल्हास्तरावर सप्ताह सुरु करण्यात आला आहे. यावेळी जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करावे. कार्यक्रमास जिल्हास्तरावरील लोकप्रतिनिधी, महानगर पालिकेचे पदाधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे. पालकमंत्र्यांच्या संबोधनाने या उपक्रमाचा समारोप होईल. जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने जलस्त्रोत वाढविण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
चंद्रकांत कारभारी
जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment