28 April, 2025

नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देणार -जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील नागरिकांना विनाविलंब आणि विनासायास, तसेच ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्याला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी अनेक सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून, या सेवा शहरापासून ते गावाखेड्यापर्यंतच्या नागरिकांना विनाविलंब उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सेवा हक्क दिनाच्या दर्शकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. गुप्ता बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, तहसीलदार अश्विन माने उपस्थित होते. शासनाने दिनांक 1 एप्रिल 2015 रोजी '28 एप्रिल' हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुषंगाने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, 10 वर्षांपूर्वी शासनाने जनतेला नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क देणारा ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ अंमलात आणला आहे. या अधिनियमातील कलम 4 अन्वये महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अशा नियत कालमर्यादेतच जनतेला लोकसेवा देण्याची जबाबदारी दिली आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे त्याचे उत्तरदायित्व निश्चित केले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले. हा लोक सेवा हक्क अधिनियम प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य भावनेतून जनतेची सेवा करण्यासाठी प्रेरीत करत असल्याचे सांगून ते म्हणाले की, शासनाने आयोगाच्या शिफारशी नुसार आयोगाने निर्धारीत नागरीकांना दिल्या जाणाऱ्या सर्व अधिसूचित सेवा कालमर्यादेत देण्याचे सांगितले आहे. अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सेवाभाव हेच कर्तव्य ही कर्मयोगाची भावना असल्याचे सांगितले. राज्य शासनाने महाराष्ट्र लोक सेवा हक्क आयोगाची दशकपूर्ती साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, हा एक चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिसूचित केल्या आहेत. या सेवा शहरापासून ते गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात अजूनही सुधारणा करण्यास वाव आहे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. या सेवा नागरिकांना घरबसल्या मिळाव्यात, यासाठी काम करूयात. या सेवा केंद्र संचालकाकडून मिळवून दिल्या जात आहेत. त्यामध्ये अजून उत्तम नियोजन करून कर्मचाऱ्यांमार्फत अधिक सेवा घरपोच देण्याचा प्रयत्न करूयात, असे सांगितले. ऑनलाईन सेवा विहित मुदतीत देण्याचा राज्य शासनाचा आणि जिल्हा प्रशासनाचा मनोदयही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी व्यक्त केला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शकतेने, विनासायास आणि सहज घरच्या घरी ऑनलाईनरित्या या अधिसूचित सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी प्रास्ताविकात या दिनामागची भूमिका, त्याची प्रभावी अंमलबजावणीबाबत माहिती दिली. उत्कृष्ट काम करणा-या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, शारदा दळवी, पोलीस अधिकारी कुंदन कुमार वाघमारे, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड या अधिका-यांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपले सरकार सेवा केंद्रांचे संचालकांना जिल्हाधिका-यांच्या हस्ते लैपटॉपच्या किटचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना लोकसेवेची शपथ देण्यात आली. तहसीलदार अश्विन माने यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. *****

No comments: