07 April, 2025

फळ पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे 25 एप्रिलपर्यंत पूर्ण करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 07 : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना दि. 12 जून, 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये हिंगोली जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत मृग बहार सन 2024 मध्ये संत्रा व मोसंबी या 2 फळपिकांसाठी जिल्ह्यामध्ये तर आंबिया बहार सन 2024-25 मध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब व केळी या 4 फळपिकांसाठी जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. फळपिकांचा विमा घेतलेल्या मात्र फळपिकांची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपव्दारे केलेली नाही, त्यांनी दि. 25 एप्रिल, 2025 पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी अन्यथा दि. 12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार सातबारा उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. या बाबतीत सविस्तर माहितीचा दि. 12 जून 2024 चा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. *******

No comments: