27 September, 2021

 

वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेचा हवामान खात्याचा इशारा 

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

हिंगोली, (जिमाका) दि. 27 : भारतीय हवामान विभागाने दि. 27 सप्टेंबर, 2021 ते दि. 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट व पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात अथवा दुर्घनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1) आकाशात विजेचा कडकडात होत असताना शेतकऱ्यांनी  तसेच नागरिकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2) जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3) झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4) वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5) वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6) विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करुन ठेवावीत.

7) वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

आकाशात विजा चमकत असल्यास हे करु नका :

1) पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.

2) विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3) दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4) धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका. 

            त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वरीलप्रमाणे खबरदारी घ्यावी . 

****

No comments: