24 September, 2021

 



शेतकऱ्यांना शेतीवर आधारित उद्योग सुरु करुन दिल्यास

शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल

                                                - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्याचा विकासाचा निर्देशांक सर्वात कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वत:च्या जमिनीमध्ये शेतीवर आधारित उद्योग सुरु करुन दिल्यास त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कल्याण होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वाणिज्य विभाग व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातदारांचे संमलेन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एम. कच्छवे, जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक सावंत, एक्सपोर्ट कन्सलटंट सुरेश पारीख, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक किरण जाधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांना शेतीवर आधारित उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करावे व ज्यांच्याकडे  पाण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिल्यास शेतकरी आपला स्वत:चा उद्योग उभारुन सक्षम होईल, असे सांगितले.   

या संमेलनात आयात निर्यात धोरणाविषयी एक्सपोर्ट कन्सलटंट सुरेश पारीख यांनी जिल्ह्यात निर्यात वाढविण्यासाठी येणाऱ्या अडचणीवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. एम. कच्छवे व जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक सावंत यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी निर्यातदारांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या संमेलनास जिल्ह्यातील निर्यातदार, उद्योजक, औद्योगिक संघटना, स्वयंसेवी संस्था, शेतकरी उत्पादक गट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******

No comments: