29 September, 2021

 




कृषी विज्ञान केंद्रात वेबकास्टिंग द्वारे प्रधान मंत्री यांनी केला शेतकऱ्यांशी  संवाद

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : भारताचे प्रधान मंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी हवामान बदलास अनुकुल असे 35 विविध पिकांचे वाण  राष्ट्रास समर्पित केले. त्याच प्रमाणे रायपूर येथे राष्ट्रीय जैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे उदघाटन सुद्धा केले.  या कार्यक्रमाचे प्रसारण कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमानंतर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. पी.पी.शेळके यांनी सादरीकरण करुन विविध पिकांच्या वाणापैकी हिंगोली जिल्ह्याला उपयुक्त वाणांची माहिती दिली. प्रा. राजेश भालेराव यांनी बी.डी.एन. 711 या तुरीच्या वाणांचे, परभणी मोती या ज्वारीच्या वाणाचे तसेच सोयाबीनच्या एम.ए.यु.एस. 71 या वाणांचे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राद्वारे देण्यात आल्याची माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ अजयकुमार सुगावे  यांनी पीक संरक्षण साठी उपयुक्त सात सूत्रांची  माहिती दिली.  प्रा. अनिल ओळंबे  यांनी सद्यस्थितीत हळद पिकाची काळजी कशी घ्यावी या संबधी माहिती दिली. 

या कार्यक्रमाचे संचलन प्रा. अनिल ओळंबे  यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रोहिणी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

****

No comments: