17 September, 2021

 


परिवहन महामंडळाच्या माध्यमातून शासन जनतेची सेवा करण्यासाठी बांधील

-- परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

 

        हिंगोली, (जिमाका) दि. 17 :  परिवहन महामंडळाच्या माध्यमातून शासन जनतेची सेवा करण्यासाठी बांधील आहे, असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी आज केले.

            येथील बस स्थानकाचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ते यावेळी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत नवघरे, माजी आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, परभणी विभागाचे विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांची उपस्थिती होती.

            यावेळी बोलताना परिवहन मंत्री परब म्हणाले, कोरोना महामारीमुळे सन 2018 पासून हिंगोली बसस्थानकाचे उदघाटन लांबले होते. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून हिंगोलीच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे  त्यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. त्यामुळे हिंगोली बसस्थानकाचे आज उद्घाटन करत असल्याचे जाहीर करुन हे बस स्थानक जनतेच्या सोयीसाठी खुले करुन देण्यात येत असल्याचे सांगितले. या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची वृत्ती सतत बजावत राहू अशी ग्वाही देवून कोरोना महामारीमुळे महामंडळाची परिस्थिती चांगली नसली तरीसुध्दा या बसस्थानकातील राहिलेली उर्वरित छोटी-छोटी कामे टप्याटप्याने लवकरच पूर्ण करण्यात येतील. तसेच आपण दिलेल्या सूचना आचरणात आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी  सांगितले.

            कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या या सुवर्ण क्षणी हिंगोली बस स्थानकाचे उद्घाटन झाल्यामुळे आयोजकाचे धन्यवाद मानून या बसस्थानकाचा सर्वांना फायदा होणार असल्याचे सांगून बस स्थानकाचे उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना यांनी यावेळी केल्या.

जिल्ह्यातील बसस्थानकासह हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस नव नवीन कामे होत आहेत. स्वच्छता व विविध विकास कामाच्या माध्यमातून जिल्ह्याने वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरु आहे, असे सांगून वाहतूक नियंत्रक केशव गोरे यांनी त्यांच्या एकुलता एक मुलांचे निधन झाल्यामुळे स्वत:चे दु:ख विसरुन त्याच्या स्मरणार्थ डिग्रस कऱ्हाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्या बांधकामासाठी 07 लाख  रुपये निधी दिल्यामुळे त्यांचे अभिंनदन केले.  

            यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेले वाहतूक नियंत्रक शेख सलीमोद्दीन व वाहतूक नियंत्रक केशव गोरे यांचा सत्कार करण्यात आला .

            यावेळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

No comments: