29 September, 2021

 






माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

 हिंगोली (जिमाका), दि. 29 : ऑक्सिजन कमी असलेल्या कारगील या ठिकाणी आपल्या सैन्यांने काम केले आहे. त्यांनी कारगील युध्दात भारतीय सैन्य दलाने आपले शौर्य दाखवून दिले आहे. या युध्दात हुतात्मा पत्करलेल्या सैनिकांना सलाम करुन श्रध्दांजली अर्पण करीत आहे, असे सांगून माजी सैनिक व सैनिकांच्या विधवांच्या काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर उपस्थित होते.

भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर, 2016 रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्याचा खात्मा केला होता. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा, माजी सैनिकांच्या विधवा यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले असल्याची माहिती संजय कवटे यांनी दिली.

कार्यक्रमांच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन वीर जवान व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच दोन मिनिटे मौन पाळून वीर जवानांच्या प्रतिमेस श्रध्दांजली अर्पण केली.

यावेळी माजी सैनिक रामराव जाधव, शेर खान पठाण, गोपीनाथ दळवी, सुभाष अरसोड, पांडूरंग सातव यांचा व माजी सैनिकांच्या विधवा गोदावरी धुगे, मेघा ठाकरे, गीताबाई ढवळे, सीमाबाई दरणे, रेणुका बोरगड यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे उत्तमराव लेकुळे, सर्व माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवा उपस्थित होते.

*****

No comments: