21 September, 2021

 




सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी

                                                                                                - पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड

 हिंगोली, (जिमाका) दि. 21 :  कोरोनासारख्या आजारामुळे स्व. खासदार राजीवभाऊ सातव यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी आज केले.

हिंगोली तालुक्यातील चिंचोली येथे स्व. खासदार राजीव सातव यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी माजी आमदार संतोष टारफे, डॉ. प्रज्ञाताई सातव, संजय बोंढारे, केशव नाईक, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, तहसीलदार संदीप राजपुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, स्व. खासदार राजीव सातव यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता सातत्याने समाजाची सेवा केली आहे. परंतु कोरोना आजारामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांना आपण मुकलो आहोत. यासाठी आपले आरोग्य महत्वाचे आहे, असे सांगून सर्व नागरिकांनी आपले आरोग्य जपावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे सांगितले.

पुढे बोलतांना पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, स्व.राजीव सातव यांच्या दूरदृष्टीमुळे सामाजिक न्याय व इतर विविध योजनाच्या माध्यमातून तसेच विविध सामाजिक उपक्रमांतून हिंगोली जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागणार आहे. या माध्यमातून आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना होणार आहे. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी विविध विकासात्मक सामाजिक कार्यक्रम राबविणे हीच आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना श्रंध्दाजली वाहण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे महाआरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले असल्याचे सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते स्व. राजीव सातव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रंध्दाजली वाहण्यात आली. त्यानंतर फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जंतनाशक दिन मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वितरण करुन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी विविध विभागांना भेटी देवून पाहणी केली.

या शिबिरामध्ये रक्तदान तसेच कोविड लसीकरण, कोविडची अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणी, रक्त तपासणी व महिलांचे थॉयराईड तपासणी यासह विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच 1 ते 19 वयागेटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

यावेळी डॉक्टर, अधिपरिचारिका, पदाधिकारी व चिंचोलीसह परिसरातील विविध गावांचे हजारो नागरिक या महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उपस्थित होते.

*******

No comments: