01 October, 2022

 

जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये 2 ऑक्टोंबर रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत

महाश्रमदान व विविध उपक्रम राबविण्यात येणार

     

हिंगोली (जिमाका), दि. 01 : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशनानुसार जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवले जात आहे. गावांच्या दृष्यमान स्वच्छतेची राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात 2 ऑक्टोंबर, 2022 रोजी व्यापक प्रमाणात महाश्रमदान सर्व गावात राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील सर्व 563 ग्रामपंचायतीमध्ये 2 ऑक्टोंबर रोजी महाश्रमदान मोहीम व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात उस्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हिंगोली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये  महाश्रमदान व स्वच्छता ही सेवा या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी व  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील विविध विभागाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुख यांना महाश्रमदान कार्यक्रमास उपस्थित राहून ग्रामपंचायतमध्ये  मोठ्या प्रमाणात स्वच्छता व श्रमदान मोहीम व्यापक प्रमाणात  राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, मंदिर, आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, महाविद्यालय, दवाखाने, विविध सहकारी संस्था, सरकारी कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. गावातील सार्वजनिक ठिकाणचे सार्वजनिक पानवठे, पिण्याच्या पाण्याच्या बाजूला सर्व स्वच्छता करण्यात आली. गावातील केरकचरा व प्लास्टिक कचरा याचे विलगीकरण करुन वेगळा करण्यात आला. यावर्षी या मोहिमेची दृष्यमान स्वच्छता ही संकल्पना आहे.

गावामध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्यासाठी स्वच्छता ही सेवा या मोहिमेत गावामध्ये महाश्रमदान कार्यक्रम आयोजित करुन दृष्यमान स्वच्छता, गावातील कचरा कुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा स्त्रोताच्या ठिकाणी (सुका व ओला) कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती करणे, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्र निर्माण करणे, प्लॅस्टिकसारखा अविघटनशिल कचरा एकत्रित करुन नियोजन करावे, पाणवठ्यांजवळील परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्षारोपण करणे, एकल प्लॅस्टिक वापराच्या दृष्यपरिणामांबद्दल जनजागरण करणे, हागणदारीमुक्त अधिक घटकावर सरपंच संवाद आयोजित करणे, गावात कचरा न करण्यासाठी जनजागृतीपर घोषवाक्य लेखन, प्रतिज्ञा घेणे, प्लॅस्टीक बंद बाबत स्वच्छता ही सेवा या अभियाना मध्ये जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतींनी, गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शाळेचे शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात युवक वर्ग व महिला बचत गटातील महिला यांचा मोठ्या प्रमाणात  उपस्थिती, शाळेतील महाविद्यालयातील  शाळेचे विद्यार्थी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले आहे.

******

No comments: