13 October, 2022


 

रेशीम शेतीमधील उत्कृष्ट कार्याविषयी अशोक वडवळे यांना

राष्ट्रीय कृषी सेवा रत्न पुरस्कार जाहीर

हिंगोली (जिमाका), दि. 13 : रेशीम शेतीमध्ये दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल महात्मा फुले समता परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय कृषी सेवा रत्न पुरस्कार जिल्हा रेशीम कार्यालयातील प्रकल्प अधिकारी अशोक वडवळे यांना जाहीर झाला आहे.

श्री. वडवळे हे येथील जिल्हा रेशीम कार्यालयात प्रकल्प अधिकारी या पदावर कार्यरत असून त्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये रेशीम शेतीचा प्रचार, प्रसार होण्यासाठी तसेच रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्कृष्ट पध्दतीचे तांत्रिक मार्गदर्शन मिळावे म्हणून नवनवीन तांत्रिक बाबींचा वापर केला आहे. त्यांनी स्वत:चे युट्यूब चॅनल  सुरु केले असून त्या माध्यमातून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध महाराष्ट्रातील रेशीम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांची संवाद साधण्याची रांगडी पध्दत शेतकऱ्यांना प्रचंड भावली आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या संवाद कौशल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. उत्कृष्ट पध्दतीने रेशीम शेती करुन स्वत:चा उत्कर्ष साधून घेत आहेत.

महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र यांनी श्री. वडवळे यांच्या या कार्याला सलाम करत व त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय कृषी सेवा रत्न पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. 30 ऑक्टोबर, 2022 रोजी कोल्हापूर येथे भव्य समारंभात होणार आहे.

संबंधित पुरस्काराविषयी माहिती मिळताच हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी श्री. वडवळे यांचा सत्कार केला.

श्री. वडवळे यांनी मिळालेल्या पुरस्काराबाबत बोलताना हा पुरस्कार रेशीम शेती करणाऱ्या तमाम शेतकऱ्यांना, त्यांच्या मेहनतीला, चिकाटीला अर्पण करतो असे गौरवोद्गार काढले.

******

No comments: