21 November, 2022

 

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा व उजवा कालव्याच्या

लाभक्षेत्रातील लाभधारकांनी रब्बी हंगाम पाणी पाळीसाठी अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 21 :  उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा व इसापूर उजवा कालवाच्या लाभक्षेत्रातील लाभधारक व इसापूर धरण जलाशय, अधिसूचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील हंगामी, दुहंगामी असेच दुहंगामातील इतर उभी पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना सात, सात-अ मध्ये भरुन दि. 30 नोव्हेंबर, 2022 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात सादर करावेत. हंगामी  व दुहंगामी पिकांसाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत.

यावर्षी इसापूर धरणात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असून त्यानुसार रब्बी हंगामात चार (04) पाणीपाळ्या देण्याचे अपेक्षित आहे. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच मागणी लक्षात घेता प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी        दि. 22 नोव्हेंबर, 2022 रोजी सुरु करण्याचे अपेक्षित नियोजन आहे. तथापि इतर पाणीपाळ्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील होण्याच्या निर्णयाच्या अधीन राहुन करण्यात येईल.

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा  व इसापूर उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल .

रब्बी हंगाम सन 2022-23 मधील पहिल्या पाणीपाळीचा प्रस्तावित कार्यक्रम आवर्तन क्रमांक 01 हा दि. 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर, 2022 या कालावधीत 22 दिवस सोडण्यात येणार आहे. पाऊस किंवा आकस्मिक घटनांमुळे आवर्तनाच्या दिनांकात बदल होऊ शकतो.

नमुना नं. सात, सात-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जास खालील अटी व शर्तींचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येणार आहे.

लाभधारकांना त्यांच्याकडील संपूर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. रब्बी हंगामी , दुहंगामी  व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात सादर करावे. अर्जासोबत उपसा सिंचन परवानगीची प्रत जोडावी. तसेच पाणी अर्जासोबत अपत्याबाबतचे प्रमाणपत्र व अल्प,अत्यल्प भूधारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकाची आहे. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच महाराष्ट्र पाटबंधारे प्रचलित नियमांचे लाभधारकांकडून उल्लंघन झाल्यास, कोणतीही आगाऊ सूचना न देता दिलेली मंजुरी रद्द करण्यात येईल व पाणीपुरवठा रद्द करण्यात येईल. सिंचन पाणीपाळी दरम्यान कालव्याची काही तुटफूट झाल्यास, त्याची दुरुस्ती झाल्यानंतरच कालव्यात पाणी सोडण्यात येईल. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976, कालवे नियम 1934, म. सिं. प. शे. व्य. कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे  बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास या कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकरण्यात येतील. उडाप्याच्या/ अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी  मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे, अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही.

उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रांतर्गत वितरण व्यवस्था व कालवे हे फार जुने असल्यामुळे सदर कालवे केवळ 50 टक्के ते 70 टक्के क्षमतेनेच वाहतात. त्याकारणास्तव लाभक्षेत्रातील अतिपुच्छ भागातील लाभधारकांना तूर्त पाणी मिळेल याची हमी देता येणार नाही. या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबंधित लाभधारकांनी नोंद घ्यावी.

उपरोक्त सर्व अटी व नियमांचे पालन करुन विभागास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.1, नांदेड यांनी केले आहे.

*****

No comments: