07 April, 2022

 

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी

20 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत

 

           हिंगोली, दि. 07  (जिमाका) : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता -शिवा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छूक व्यक्ती व संस्था यांनी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सिलबंद लिफाफ्यात दि. 20 एप्रिल 2022 पर्यंत रितसर अर्ज करावेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

शासन निर्णयान्वये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद, दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तींसाठी एक व सामाजिक संस्थेसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

हे पुरस्‍कार सन 2018-19, 2019-20, 2020-21 व 2021-22  अशा चार वर्षांसाठी चार वेगवेगळे रितसर अर्ज करण्‍यात यावेत.  तसेच हे अर्ज दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी पूर्वी सादर करण्‍यात यावेत. या पुरस्‍कारासाठी पात्रताबाबतची नियमावली दि. 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयासोबत जोडण्‍यात आलेली असून महाराष्‍ट्र शासनाच्‍या वेबसाईटवर संबंधित शासन निर्णय असून त्‍याचा सांकेतांक क्रमांक 201903082039003522 असा आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी वरील चारही वर्षासाठी दोन वेगवेगळ्या उपरोक्त पुरस्कारासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्याकडे दि. 22 जुलै, 2019 च्या शासनपत्रामध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये व अर्जासोबत नियमाप्रमाणे आवश्यक ती माहिती जोडून दि. 20 एप्रिल, 2022 पर्यंत रितसर अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

 

No comments: