06 April, 2022

 

आजपासून दहा दिवस जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’

6 ते 16 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली, दि. 06  (जिमाका) :  शासनाने राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दि. 6 एप्रिल ते 16 एप्रिल, 2022 या कालावधीत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने शासनाच्या ज्ञापनात नमूद केल्याप्रमाणे राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाची  कार्यालये, सर्व शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय वसतिगृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून दिनांकासह कार्यक्रमाचे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे.

दि. 06 एप्रिल रोजी या सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल व पुढील उपक्रमांची जिल्हा स्तरावर माहिती देणे.

दि. 07 एप्रिल रोजी  सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील. 

दि. 08 एप्रिल रोजी जिल्हा व विभाग स्तरावर कार्यक्रम आयोजित करुन स्वाधार शिष्यवृत्ती, मिनीट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात येईल.

दि. 09 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवणे तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने सर्व महाविद्यालये, आश्रम शाळा, शासकीय वसतीगृह,  निवासी शाळा येथे रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.

दि. 10 एप्रिल रोजी समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहिती बाबत प्रबोधन करण्यात येईल.

दि. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे, विविध वक्त्यांना निमंत्रित करुन महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य या विषयावर कार्यक्रम येईल.

दि. 12 एप्रिल रोजी सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत मार्जिन मनी योजनेच्या जनजागृती बाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. 

दि. 13 एप्रिल रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. 

दि. 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्याठिकाणी व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करुन बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील. 

दि. 15 एप्रिल रोजी सहाय्यक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करुन बाबासाहेबांच्या महिलांविषयी  कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करुन ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल.

दि. 16 एप्रिल या शेवटच्या दिवशी  ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे. तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल. 

जिल्ह्यात वरीलप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती शिवानंद मिनगीरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

*****

No comments: