27 April, 2022

 मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका) दि.27 :  मुद्रांक शुल्क रक्कमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत देण्याचा शासनाचा मनोदय होता. त्यासाठी शासनाने दि. 1 एप्रिल, 2022 च्या आदेशान्वये शास्तीच्या कपातीची योजना जाहीर केली आहे. ही योजना दि. 1 एप्रिल, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत आठ महिने कार्यान्वित राहणार आहे.

शासनाने आतापर्यंत सन 1994-95, 1997, 1998, 2004 व 2019 मध्ये माफी योजना राबविली आहे. परंतु नव्याने आलेली माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

ही योजना अधिसूचनेसोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद दस्तऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची-1 च्या अनुच्छेदांतर्गत आकारणी योग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमाच्या कलम 31 च्या पोटकलम 4 च्या खंड (दोन), कलम 32 अ च्या पोटकलम 2 आणि पोट कलम 4 च्या पहिल्या परंतुकानुसार तसेच कलम 39 च्या पोट कलम 1 च्या खंड (ख) च्या तरतुदीनुसार लागू होणारी एकूण शास्ती ही अटी व शर्तीच्या अधीन राहून दहा टक्केपर्यंत कमी केली आहे. दि. 1 एप्रिल, 2022 ते 31 जुलै, 2022 या कालावधीसाठी असून दि. 1 ऑगस्ट, 2022 ते 30 नोव्हेंबर, 2022 या कालावधीसाठी 50 टक्के कमी केली आहे. ही सवलत 31 मार्च, 2022 रोजी किंवा त्यापूर्वी निष्पादित करण्यात आलेल्या संलेख तथा दस्तांनाच लागू असेल.

या आदेशातील कपात ज्या प्रकरणी चुकवेगिरीची किंवा अडकवून ठेवण्याची किंवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु करण्यात आलेली असेल आणि ज्या प्रकरणी उक्त अधिनियमाची कलमे 31, 32अ, 33, 33अ, 46, 53(1अ) व 53अ यांच्या तरतुदी अन्वये 31 मार्च, 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पक्षकारावर किंवा निष्पादकावर किमान एक नोटीस बजावण्यात आलेली आहे अशा प्रकरणीच केवळ लागू असेल. तसेच या आदेशाखालील उक्त कपात ज्या प्रकरणी, उक्त अधिनियमाच्या तरतुदीअन्वये कोणत्याही प्राधिकरणासमोर किंवा न्यायालयासमोर अपील किंवा पुनर्विलोकन किंवा पुनरिक्षण अर्ज प्रलंबित आहे अशा प्रकरणी देखील लागू असेल.

ही माफी योजना मुद्रांक तुट व शास्तीची वसुली सुरु आहे अशा प्रकरणांना लागू करण्यात आली आहे. ज्या प्रकरणात मुद्रांक चुकविल्याबाबत वसुलीची अथवा अभिनिर्णयाची कार्यवाही सुरु झाली आहे अशा प्रकरणांना दंड सवलत योजना लागू करण्यात आली आहे.

या माफी योजनेद्वारे विभागात सुरु असलेली दंड प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे कमी करुन मुद्रांक व नोंदणी विभागाचा या कामकाजात जाणाऱ्या वेळेत बचत करणे व न्यायालयीन प्रकरणे कमी करणे हा मानस आहे.  या माफी योजनेत मुद्रांक शुल्कावरील दंड रक्कमेत सवलत दिली आहे. तथापि, दस्तावरील मूळ मुद्रांक शुल्काच्या तुटींची पूर्ण रक्कम शासनजमा करणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेतांना अर्जदारास विनाशर्त न्यायालयीन प्रकरण मागे घेणे बंधनकारक आहे. ज्या प्रकरणात विभागाने मुद्रांक शुल्क तुटीबाबत आदेश अंतिम केला आहे. अथवा नोटीस दिली आहे त्या रकमेप्रमाणे मुद्रांक शुल्क तूट रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. त्यानंतर कोणतेही अपील अनुज्ञेय असणार नाही. यासाठी सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील ज्या प्रकरणात मुद्रांक शुल्क तुट व दंड रक्कम भरणा करणे प्रलंबित आहे. त्या सर्व प्रकरणात नागरिकांनी मुद्रांक व नोंदणी विभागाच्या कार्यालयात संपर्क करुन या दंड सवलत  योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. मुद्रांक व नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशने > परिपत्रक > मुद्रांक > अभय योजना या सदराखाली दि. 2 मार्च, 2019 रोजीचा शासन आदेश नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल.

याबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाचे 8888007777 या कॉल सेंटरवर व complaint@igrmaharashtra.gov..in  या ई-मेल पत्यावर संपर्क साधावा, असे आवाहन संजय पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.  

****

No comments: