21 April, 2022

 

जननीच्या जनजागृतीने बालविवाह रोखण्यात यश

 

हिंगोली (जिमाका),  दि. 21 : जिल्ह्यात महिलाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सुरु केलेल्या जननी उपक्रमाच्या जनजागृतीमुळे बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. जननी उपक्रमामुळे महिलांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास निर्माण झाला असून डायल 112 क्रमांकावर संपर्क साधला जात आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात जननी उपक्रम हाती  घेण्यात आला आहे. अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची माहिती पोलिस विभागाला मिळताच आखाडा बाळापुर पोलिस स्टेशन सपोनि पंढरीनाथ बोधनापोळ व सहायक पोलीस उपनिरीक्षक सिद्दीकी यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हा बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

            हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील सर्व गावामध्ये जननी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून दिलासा मिळाल्यानेच कळमनुरी येथील माळी गल्ली येथील बालिकेचा बालविवाह बेलथर येथे होणार होता, असा  डायल 112 वर कॉल आला. गावात काही दिवासाने बालविवाह होणार असून हा बालविवाह थांबविण्याची विनंती करण्यात आली. याची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे पोह. पंढरी चव्हाण, मपोह. रोहिणी इंगाले, मपोशी.सुचित्रा कोंडामंगल तसेच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बालसंरक्षण अधिकारी गणेश मोरे, बालसंरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांच्या पथकाने नियोजित 25  एप्रिल, 2022 रोजी होणारा बालविवाह थांबविण्यात आला.

            दोन्ही पथकाने अल्पवयीन मुलीचे तसेच आई-वडील व नातेवाईकाचे समुपदेशन केले. बालविवाहाचे दुष्परिणाम मुलीचे शिक्षण व भविष्याविषयी मार्गदर्शन केले. हमीपत्र लिहून घेण्यात आले व बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार हा गुन्हा आहे या कायद्याचे पालन न केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा प्रशासना कडून देण्यात आला असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

******

No comments: