02 December, 2022

 

स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

01 ते 31 डिसेंबर या कालावधीत पाणी गुणवत्तेचा जागर

 


               हिंगोली (जिमाका), दि. 02 : केंद्र शासनाच्या जनशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलजीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना स्वच्छ व दर्जेदार पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जल जीवन सर्वेक्षण 2023 चा भाग असणार आहे.  स्वच्छ जल से सुरक्षा हे महत्त्वकांक्षी अभियान जल जीवन सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्वच्छ जल से सुरक्षा या अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे, उपकार्यकारी अभियंता खडसे, पवार, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.

संपूर्ण जिल्ह्यात दि. 01 डिसेंबर ते 31 डिसेंबर,2022 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत मिशन मोडमध्ये एक महिन्यात पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद हिंगोलीच्या वतीने स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांच्या अस्तित्वातील सर्व स्रोतांचे जिओ टॅगींग, पाणी गुणवत्ता परीक्षण, हर घर जल अँप्लिकेशनचे प्रशिक्षण, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने मान्सून पश्चात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक तपासणीसाठी दि. 23 डिसेंबर,2022 पर्यंत जल सुरक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करण्याचे काम शंभर टक्के पूर्ण करुन रासायनिक व जैविक तपासणीच्या परिणामाच्या नोंदी एमआयच्या पोर्टलवर करणे व दूषित आढळणाऱ्या पाणी स्त्रोतांचे प्रतिबंधात्मक उपायोजना करणे ही कामे शंभर टक्के पूर्ण करणे. पाणी गुणवत्ता परीक्षण,  पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी, WQMIS संकेतस्थळावर माहिती अद्यावत करणे. तसेच FTK किटची उपलब्धता, जलसुरक्षक व प्रत्येक गावातील निवड केलेल्या 5 महिलांचे प्रशिक्षण व  त्याद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी या सर्व बाबी अभियान स्वरुपात दि. 01 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

     “स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान राबवून जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी   जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने सहभाग घ्यावा, असे आव्हान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे. विहित कालावधीत अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.एल. बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार महेश थोरकर, जिल्हा  पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व सल्लागार व तज्ञ यांच्या संनियंत्रणाखाली काम करण्यात येणार आहे .

*****

No comments: