10 December, 2022

 

प्रधानमंत्री पीक विमा योजना

रब्बी हंगामासाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : राज्यात रब्बी-2022 हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यासाठी क्लस्टरनिहाय विमा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय-लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. माणिकचंद आयकॉन, 3 रा मजला, प्लॉट नं.246, सी-विंग, बंड गार्डन, पुणे-411001, टोल फ्री क्रमांक-18001037712, जिल्हा प्रतिनिधी : साईप्रसाद उल्हारे मो. क्र. 7350413163, ई-मेल : customersupportba@icicilombard.com  या विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे.

रब्बी हंगामात विमा संरक्षण उपलब्ध असलेल्या पिकांपैकी गहू बागायत व हरभरा या पिकांना विमा हप्ता भरण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. या योजनेअंतर्गत हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध कारणामुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट, नैसर्गिक आपत्ती इत्यादीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसाठी विमा कवच मिळणार आहे. पीक विमा हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल (pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे.

गहू बागायत या पिकासाठी संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 42 हजार असून शेतकऱ्यांने भरावयाचा विमा हप्त्याची प्रती हेक्टरी रक्कम 630 रुपये आहे. तर हरभरा पिकासाठी  संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 37 हजार 500 असून शेतकऱ्यांने भरावयाचा विमा हप्त्याची प्रती हेक्टरी रक्कम 562.50 रुपये आहे.

पीक विमा हप्ता भरण्यासाठी अंतिम मुदत ही 15 डिसेंबर, 2022 असून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करुन विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे.

****

No comments: