05 December, 2022

 

सामाजिक न्याय समता पर्व निमित्ताने

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी व्यक्तींची कार्यशाळा संपन्न




 

                 हिंगोली (जिमाका),दि. 05 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता पर्व"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून रविवार, दि. 04 डिसेंबर, 2022 रोजी  शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती व तृतीयपंथी व्यक्ती यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पेन्शनर्स असोशिएशनचे मनोहर पोपळाईत हे होते.

जेष्ठ नागरिकाच्या अडचणीसाठी व तृतीयपंथी व्यक्तींच्या विकासासाठी सदैव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवानंद मिनगीरे यांनी याप्रसंगी केले. तसेच तृतीयपंथीसाठी राजाराम बहुउ्देशिय सेवाभावी संस्था, वसूर, ता.मुखेड, जि.नांदेड हे सतत प्रयत्नशील असून तृतीयपंथींना विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे संस्थेचे सचिव सदाशिव शिंदे यांनी सांगितले. यावेळी तृतीयपंथीच्या अध्यक्षा अर्चना शहानूर बकास यांनी जिल्हास्तरावर तृतीयपंथीसाठी किन्नर भवन व स्मशानभूमीची मागणी आपल्या मनोगतामध्ये केली आहे. तसेच केंद्रीय अण्णपूर्णा वृध्दाश्रम, जवळा पळसी, ता.सेनगांव, जि.हिंगोली येथील लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अण्णपुर्णा वृध्दाश्रमात मिळणाऱ्या उत्तम सुविधाचे गुणगाण केले. जेष्ठ नागरिकांनी मनोगत व्यक्त करतांना व्यक्तींचे स्वातंत्र्य, हक्क, अधिकार व संविधानाबाबतचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवानंद मिनगीरे यांनी  केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी गिते यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक इंगोले यांनी केले.

या कार्यशाळेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी  शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी उपस्थित जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती व तृतीयपंथी व्यक्ती यांना सामाजिक न्याय विभागांच्या वतीने विविध योजनांची माहिती सांगण्यात आली.

*****

No comments: