13 February, 2023

 

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी

प्रवेशिका आणि पुस्तके पाठविण्यासाठी 2 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 2022 या प्रकाशन वर्षासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात पाठविण्यासाठी 2 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 31 जानेवारीपर्यंत होती.

दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सवानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. 

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award 2022 Extension of period for sending Books and Application Form' शीर्षाखाली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ http://sahitya.marathi.gos.in या संकेतस्थळावर प्रवेशिका नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक किंवा प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. 

मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक किंवा प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक किंवा प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. 

लेखक किंवा प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर,  पाकीटावर ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 2 मार्च, 2023 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर (दिनांक 2 मार्च 2023) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.

            या योजनेअंतर्गत लेखक व प्रकाशकांना प्रवेशिका पाठविण्यास सुलभ व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखेत सोय केली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील लेखक व प्रकाशकांनी आपली प्रवेशिका व पुस्तके संबंधित तहसील कार्यालयात दि. 02 मार्च, 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.  

*******

No comments: