03 February, 2023

 

प्रधानमंत्री किसान योजनेचा तेरावा हप्ता मिळण्याची सुविधा

आता गावच्या पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध

• आय पी.पी.बी. खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक


हिंगोली (जिमाका), दि. 03 : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास तीन हप्त्यात दोन हजार रुपयाप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेचा तेरावा हप्ता जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे आयपीपीबी (IPPB) खात्याशी आधार क्रमांक लिंक असणे बंधनकारक आहे. यासाठी हप्ता उचलण्याची सुविधा पोस्टमनच्या माध्यमातून गावातच करुन देण्यात आली आहे.

राज्यात सद्यस्थितीत 14 लाख 32 हजार लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नाहीत. यात परभणी जिल्ह्यातील 24 हजार आणि हिंगोली जिल्ह्यातील 15 हजार 106  लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात तेराव्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही . लाभार्थ्यांना त्यांचे खाते IPPB मार्फत उघडण्याची व ते आधार क्रमांकाशी लिंक करण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्टमास्तर यांच्यामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आपले आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. IPPB तर्फे गावात येऊन सदरील सेवा देण्यात येणार आहे. यासोबतच ज्यांचे खाते उघडले गेलेले नाही त्यांचे खातेही उघडून देण्यात येणार आहेत. ते खाते आधार क्रमांकाशी 48 ते 72 तासात जोडले जाईल.

01 ते 10 फेब्रुवारी दरम्यान राज्यभर मोहिम

प्रधान मंत्री किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते IPPB मध्ये उघडून ती आधार क्रमांकार जोडण्यासाठी राज्यात IPPB कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे गावातील पोस्टमास्तर या लाभार्थ्यांना संपर्क करुन IPPB मध्ये बँक खाती सुरु करतील. योजनेच्या तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य असल्याने IPPB मार्फत 01 ते 10 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत राज्यात मोहिम राबविण्यात येत आहे.

IPPB मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

ही आधार सीडिंग पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. IPPB मध्ये बँक खाते सुरु करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही, असे अधीक्षक डाकघर, परभणी डाक विभाग, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

*****

No comments: