*अधिसूचित सेवांच्या वेळेत निपटाऱ्यात हिंगोली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी*
• मुख्य सचिवांच्या हस्ते सह्याद्रीवर होणार सन्मान
हिंगोली, दि. २५ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान मंगळवार, (दि. २८) रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित "द्वितीय सेवा हक्क दिन" निमित्त होणाऱ्या विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण (निर्धार) यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना विशेष निमंत्रण पत्र पाठविले असून, त्या पत्रानुसार, वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक अर्जांचा विहित कालावधीत निपटारा करण्यात हिंगोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याने संपूर्ण राज्यासाठी आदर्श निर्माण केला असून, राज्यातील इतर जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा विशेष सन्मान जाहीर करण्यात आला आहे. सदर राज्यस्तरीय सोहळा महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी मुख्य सचिव यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेवा हक्क अधिनियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना वेळोवेळी सूचना, आढावा बैठक, ऑनलाइन अर्ज निपटारा यंत्रणा बळकट करणे, प्रलंबित प्रकरणांवर विशेष लक्ष आणि नागरिकाभिमुख प्रशासन या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्याचा परिपाक म्हणून हिंगोली जिल्ह्याने राज्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या या यशामुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक व उत्तरदायी सेवा देण्याच्या दिशेने प्रशासनाचा आत्मविश्वास आणखी वृद्धिंगत झाला आहे.
******
No comments:
Post a Comment