हिंगोली, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
वाढत्या तापमानात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ०२४५६- २२१७०१ तर हिंगोली नगर परिषदेचा मदत कक्षाचा ०२४५६-२२३१०१:हा क्रमांक आहे. नागरिकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, मात्र योग्य खबरदारी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वातानुकूलित कक्ष व आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे.
उष्माघाताची लक्षणे म्हणून तीव्र डोकेदुखी, स्नायू आखडणे, चक्कर येणे, उलटी, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.
घ्यावयाची काळजी :
नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस यांसारख्या पेयांचा वापर करणे आवश्यक आहे. बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. दुपारी १२ ते ३:३० या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे. तसेच कलिंगड, संत्री, द्राक्षे यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खावीत.
काय टाळावे :
दुपारच्या उन्हात कष्टाची कामे करणे टाळावे. चहा, कॉफी व मद्यपान टाळावे. बंद वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नयेत.
उष्माघात झाल्यास उपाय :
एखाद्या व्यक्तीस चक्कर, मळमळ, ताप किंवा शुद्ध हरपल्यासारखे वाटल्यास त्याला सावलीत बसवावे, ओल्या कापडाने शरीर थंड करावे आणि त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करावे.
लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला, बाहेर काम करणारे कामगार तसेच हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी स्वतःची व कुटुंबियांची योग्य काळजी घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
----**----
No comments:
Post a Comment