28 April, 2026

नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध - अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 28 : जिल्ह्यातील नागरिकांना विनाविलंब, विनासायास तसेच ऑनलाईन पद्धतीने विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून, अधिसूचित सेवा शहरांपासून गावखेड्यांपर्यंत वेळेत नागरिकांना विहीत कालमर्यादेत सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी  प्रशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी केले.

जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलीस अधिकारी जमीर अब्दुल गनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासनाने दि. 1 एप्रिल 2015 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी 28 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी श्री. कांबळे म्हणाले की, शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमलात आणून नागरिकांना नियत कालमर्यादेत लोकसेवा मिळण्याचा हक्क प्रदान केला आहे. या अधिनियमाच्या कलम 4 नुसार शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

हा अधिनियम प्रशासकीय अधिकाऱ्यांना कर्तव्यभावनेतून जनतेची सेवा करण्यास प्रेरित करणारा असून, शासनाने आयोगाच्या शिफारशीनुसार नागरिकांना अधिसूचित सेवा निश्चित कालमर्यादेत देण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांचा सेवाभाव हीच कर्मयोगाची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्य शासनाने नागरिकांना विविध सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सेवा दिल्या जात आहेत. या सेवा अधिक प्रभावीपणे व घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी उत्तम नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी  प्रास्ताविकातून सेवा हक्क दिन साजरा करण्यामागील भूमिका व त्याची प्रभावी अंमलबजावणी याबाबत माहिती दिली. तसेच सर्व विभागांनी अधिकाधिक अधिसूचित सेवा सकारात्मक पद्धतीने विहित मुदतीमध्ये जनतेपर्यंत पोहोचवून हिंगोली जिल्ह्याचे नाव लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बाबतीत उज्वल करावेत, असे आवाहन याप्रसंगी केले.

कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार जीवककुमार कांबळे, सखाराम मांडवगडे, पोलीस अधिकारी  जमीर अब्दुल गनी नाईक, सरकारी  कामगार अधिकारी सिद्धेश्वर फड यांचा अपर जिल्हाधिकारी  महेंद्रकुमार कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सेवादूत पोर्टलच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान लोकसेवा हक्क दिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. त्याचे दूरदृश्यप्रणालीद्वारे प्रक्षेपणही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना लोकसेवेची  शपथ देण्यात आली. महाआयटीचे प्रकल्प समन्वयक गंगाधर लोंढे यांनी आभार मानले.

******* 






No comments: