27 April, 2026

हिंगोली जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी * नागरिकांनी खबरदारी घ्यावी

 


हिंगोली(जिमाका), दि. २७ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी सोमवार (दि. २७) रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी मंगळवार (दि. २८)साठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात या कालावधीत तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तसेच दिनांक २८ एप्रिल रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा सायंकाळी पावसाचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


*उष्णतेच्या काळात घ्यावयाची काळजी*


काय करावे :

१. तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड किंवा यकृतविषयक आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थ घ्यावेत.

२. ओआरएस, लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावेत. हलक्या रंगाचे, सैलसर सुती कपडे वापरावेत.

३. घराबाहेर पडताना डोके झाकावे, टोपी, छत्री, गॉगल वापरावा व त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर करावा.

४. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.


काय टाळावे :

१. शक्यतो उन्हात जाणे टाळावे. विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडू नये.

२. अनवाणी बाहेर जाऊ नये.

३. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करताना स्वयंपाकघर हवेशीर ठेवावे.

४. मद्यपान, चहा, कॉफी व शीतपेये टाळावीत.

५. जास्त मीठ, तिखट, तेलकट व शिळे अन्न खाऊ नये.

६. बंद चारचाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नयेत.

७. अनावश्यक उष्णता निर्माण करणारे दिवे किंवा बल्ब वापरणे टाळावे.


*विजांचा कडकडाट व पावसाच्या वेळी खबरदारी*


या गोष्टी कराव्यात :

१. गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळावे.

२. घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. बाल्कनी, छत किंवा घराबाहेर थांबू नये.

३. घरातील विद्युत उपकरणे तात्काळ बंद करावीत.

४. तारांचे कुंपण, विजेचे खांब व लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे.

५. पाण्यात उभे असल्यास त्वरित बाहेर पडावे.


या गोष्टी करू नयेत :

१. विजा चमकत असताना लँडलाईन फोन वापरू नये व शॉवरखाली अंघोळ करू नये.

२. वादळी वाऱ्याच्या वेळी लोखंडी तंबू किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये.

३. उंच झाडाखाली थांबू नये.

४. उंच लोखंडी मनोऱ्याजवळ उभे राहू नये.

५. उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये.

जिल्ह्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


*******

No comments: