19 April, 2026

 जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हिंगोली शहरात स्वच्छता मोहिमेला वेग; नागरिकांत समाधान


• जिल्हाधिकारी राहुल गुप्ता करणार पाहणी


हिंगोली, दि. १९ (जिमाका) : शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर अखेर ठोस पावले उचलण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानंतर नगर पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहिमेला वेग दिला आहे. या मोहिमेमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरातील विविध भागांतील कचरा उचलण्यात येत असून, संपूर्ण शहर स्वच्छ होईपर्यंत ही सुरुच राहणार असल्यामुळे हिंगोलीकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील बडेरा कॉम्प्लेक्स अड्डा, आदर्श कॉलेज रोड, सरस्वती नगर हनुमान मंदिर परिसर, बीएसएनएल कार्यालयाच्या पाठीमागील रस्ता तसेच डॉल्फिन चौक या भागांसह शहरात कचऱ्याचे ढीग साचले होते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीची भावना तयार झाली होती. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला.

या बाबीची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तात्काळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांना पाचारण करून स्वच्छतेबाबत कठोर सूचना दिल्या. पत्रकार परिषद संपल्यानंतर लगेचच नगर पालिकेचा स्वच्छता विभाग कामाला लागला.

 नगर पालिका प्रशासनाने या स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून, शहरातील विविध भागांमध्ये कचरा उचलणे, रस्त्यांची साफसफाई करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही स्वच्छता मोहीम पुढे कायम सुरु राहणार असून, या मोहिमेमुळे परिसर स्वच्छ व नीटनेटका दिसू लागला आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या कार्यतत्परतेची प्रचिती नागरिकांना पुन्हा एकदा आली असून प्रशासनाच्या तत्परतेचे शहरवासीयांकडून कौतुक करण्यात येत आहे. स्वच्छतेच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगर पालिका प्रशासनाने ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिका प्रशासनाने केले आहे. 

******







No comments: