22 December, 2021

 


येलो लाईन कॅम्पेन व सलाम मुंबई पॅटर्नच्या माध्यमातून

जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करावेत

                                                --- अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांचे निर्देश

हिंगोली, दि. 22 (जिमाका) :  येलो लाईन कॅम्पेन व सलाम मुंबई पॅटर्नच्या माध्यमातून योग्य नियोजन करुन जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करावेत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. बरगे बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के हे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अपर जिल्हाधिकारी श्री. बरगे म्हणाले, येलो लाईन कॅम्पेन व सलाम मुंबई पॅटर्नच्या माध्यमातून सर्व शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात याव्यात. यामध्ये जिल्हा परिषद व समाज कल्याणच्या शाळा व वसतीगृहाचा समावेश करावा. योग्य ते नियोजन करुन शाळा परिसरात विविध निर्देश फलक लावावेत. सर्व महाविद्यालयांनी तंबाखूचा सर्वे करावा. प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात शंभर यार्ड परिसरात कुठलाही तंबाखू जन्य पदार्थ विकण्यास कायद्याने बंदी आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास 200 रुपयापर्यंत दंड वसूल केला जाईल असे फलक लावावेत.  प्रत्येक तालुकास्तरावर भरारी पथकाची नेमणूक करावी. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या भिंती स्वच्छ करावेत. तसेच प्रत्येक गाव तंबाखूमुक्त करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व आशा वर्करच्या मदतीने सर्वे करुन माहिती घ्यावी. तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी जसे कार्यालय, हॉटेल, भोजनालय, गार्डन, बस स्थानक, रेल्वे स्थानकावर धुम्रपान निषेध क्षेत्र असे बोर्ड लावावेत आणि कोटपा कायदा 2003 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. 

यावेळी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजीत संगाये यांनी ग्रामीण विकास संस्थेमार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच सलाम मुंबई फांऊडेशनचे सतीश वानखेडे यांनी तंबाखु मुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

या बैठकीत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत एन.सी.डी. मधील विविध कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोविड-19 या महामारीत सुध्दा या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमामध्ये सवोत्कृष्ट कार्य केलेले डॉ. फैसल खान, डॉ.स्वाती डाखूरे, डॉ. फरिदा शेख, कुलदीप केळकर, आनंद साळवे, अर्चना पवार, अभिजीत संघई, वर्षा शेळके, सतीश वानखेडे, मोहमद आतिफ, अरबाजखान पठाण, शेख अरशद यांचा अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.

यावेळी बैठकीस पोलीस, शिक्षण, कृषी, नगर परिषद, पंचायत समिती, अन्न व औषध प्रशासन, वस्तु व सेवा कर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह डॉ.हेडगेवार दंत महाविद्यालय, आदर्श महाविद्यालय व शिवाजी महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

No comments: