07 December, 2021

 



माजी सैनिकांच्या पाल्यांनी ध्येय प्राप्ती केल्यास

युध्दात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या आत्म्यास शांती मिळेल

                                                         -- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 : माजी सैनिकाच्या गुणवत्ताधारक पाल्यांनी चांगले करिअर करुन ध्येय प्राप्ती केल्यास युध्दात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या आत्म्यास शांती मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन 2021 निधी संकलन शुभारंभाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पांडूरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुजीत जाधवर, तहसीलदार विठ्ठल परळीकर यांची उपस्थिती होती.

            यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यामुळेच आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या निधीतून माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबियासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येते. याचा लाभ सर्व माजी सैनिक, त्यांच्या विधवा व पाल्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

देशाच्या रक्षणाची भूमिका बजावत असताना आपले जवान सैनिक आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता ते सतत देशसेवा करत असतात. अशा लष्करी अधिकारी जवानांची आणि त्यांच्या कुटूंबियाची काळजी घेणे ही आपणां सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी हिरिरीने सहभाग घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मातृभूमीसाठी देशाच्या सैनिकांकडून असेच चांगले कार्य घडो, यासाठी शुभेच्छा दिल्या व माजी सैनिकांना आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे सांगून यापुढे कार्यक्रमात बुके न देता बुक देवून सत्कार करावा, म्हणजे याचा उपयोग एखाद्याचे करिअर घडवेल व विकासाला हातभार लागेल, असेही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले.

 

            मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने म्हणाले, देशात शांतता व अखंडता टिकवून ठेवण्याचे काम सीमेवरील सैनिकांनी चांगल्या प्रकारे बजावत आहेत.  आपल्या कुटंबियांची पर्वा न करता अविरतपणे सेवा करत आहेत.  त्यामुळेच आपण सुखी जीवन जगत आहोत, या सर्व सैनिकांविषयी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे सांगून माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तयार असल्याचे सांगितले.

            निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन व माजी सैनिक, विधवा मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली . तसेच सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामधून माजी सैनिकांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेस पुष्प अर्पण  करण्यात आले व देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाप्रती दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी  जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चमूने स्वागत गीत व देशभक्तीपर गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मान्यवंराच्या हस्ते श्रीमती सरस्वती बैरागी यांनी त्यांच्या पतीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक महिन्याचे निवृत्तीवेतन ध्वजदिन निधीस अर्पण केल्याबद्दल, वसमत माजी सैनिक महिला बचत गटाचा तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्‍ट कार्य केलेल्या कार्यालय प्रमुखांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप इंगेाले यांनी केले , तर संजय केवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

            या कार्यक्रमास माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर तसेच , वीर माता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव भंडगे, सुरेश भालेराव , उत्तमराव लेकुळे आदींनी सहकार्य केले.   

*******

No comments: