11 June, 2023

 

राज्यात आजपासून ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा होणार !

--------------------------------------

 अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध जनजागृतीसाठी केंद्राचा पुढाकार

------------------------------------

 व्यापक स्तरावर उपाययोजना करण्याचे सचिव सुमंत भांगे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने डिसेंबर 1987 च्या पारित केलेल्या ठरावात दरवर्षी 26 जून हा दिवस "ड्रग ॲब्यूज आणि बेकायदेशीर तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिवस" म्हणून घोषित केला होता. त्यानुसार दरवर्षी 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा केला जातो.

भारत सरकारने अंमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी 'ड्रग्स मुक्त भारत' चा संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने दि. 12 ते 26 जून 2023 या कालावधीत "नशामुक्त भारत पंधरवडा " जाहीर केला आहे व त्याबाबत सर्व राज्यांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरुद्ध लढण्यासाठी लोकांमध्ये जन जागृती निर्माण करणे हा या 'नशामुक्त भारत' पंधरवाडा कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने राज्यात 'नशामुक्त भारत' पंधरवाडा उपक्रमांतर्गत व्यापक स्तरावर उपाययोजना करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना नुकतेच दिले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन (२६ जून) या दिनाचे औचीत्य साधून जन जागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा ई-प्रतिज्ञा मोहिमा इत्यादी कार्यक्रमाच्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियान राबविण्या संदर्भात सुचित केले आहे .

राज्यात नशामुक्त भारत पंधरवाडा अंतर्गत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी नशामुक्त भारत अभियान समिती व व्यसनमुक्ती केंद्राच्या सहाय्याने समयबद्ध कार्यक्रमा अंतर्गत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन व नशामुक्त भारत पंधरवडा (दि. 12 ते 26 जून) चे आयोजन विद्यापीठ, महिला मंडळे, युवक मंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था अनुदानीत संस्था, सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च महाविद्यालये , अपंग संस्था, आश्रम शाळा, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहभागाने जन जागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, ई- प्रतिज्ञा मोहिमा इत्यादी कार्यक्रम आयोजित करावे, असे निर्देश त्यांनी राज्यातील समाज कल्याण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना  ऑनलाइन बैठकीद्वारे दिले आहेत. सदर बैठकीस समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त सहाय्यक आयुक्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते.

चौकट

नशा मुक्त भारत चे स्वप्न साकार करण्यासाठी  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा, केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यात व्यापक स्तरावर  पंधरवाडात विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या राज्यातील सर्व यंत्रणांना निर्देश दिले आहेत. सुमंत भांगे, सचिव,सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य.

*****

No comments: