19 June, 2023

 


कापूस बियाणाची एमआरपीपेक्षा जास्त दर सांगणाऱ्या

कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : सद्यस्थितीत जिल्ह्यात खरीप हंगाम सुरु झालेला आहे. शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणारे बियाणे, खते व औषधे इत्यादीची खरेदी सुरु आहे. जिल्ह्यात बियाणे, खते यांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. विशेषत: कापूस पिकाबाबतीत शेतकऱ्यांचा कल बीटीजीन असलेल्या वाणाची पेरणी करण्याकडे आहे. शासनाने तुलसी कंपनीचे बीटी कापूस वाण, कबडडी, पंगा, राशी कंपनीचे राशी 659 तसेच इतर सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या बीजी-2 कापूस बियाण्याच्या पाकिटाची कमाल किरकोळ विक्री किंमत 853 रुपये इतकी ठरवलेली आहे. तथापि, काही कृषि सेवा केंद्र चालक हे शेतकऱ्यांना एमआरपीपेक्षा जास्त दर सांगत असल्याबाबतची व्हिडिओ क्लिप  समाज माध्यमावर निदर्शनास आले आहे.

कृषि विभागाने तात्काळ त्याची दखल घेऊन व्हिडिओ संबंधित व इतर कृषि सेवा केंद्राची तपासणी केली. या तपासणी अहवाल त्रुटी आढळून आल्याने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी मंगलमूर्ती कृषि केंद्र हिंगोली, गजानन कृषि केंद्र हिंगोली, अनुसया ट्रेडर्स शिरडशहापूर, किसन ॲग्रो सर्विसेस ॲन्ड इरिगेशन शिरड शहापूर, स्वामी सुखदेवानंद कृषि सेवा केंद्र हिंगोली यांचे बियाणे विक्री परवाने निलंबित केले आहेत.

तसेच शेतकऱ्यांनी कापूस बियाणे, इतर निविष्ठा (खते, किटकनाशके इ.) एमआरपीपेक्षा जास्त दराने खरेदी करु नये. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निविष्ठांच्या गुणवत्ता, उपलब्धतेबाबत काही अडचण, तक्रार असल्यास तात्काळ कृषि विभाग पंचायत समिती औंढा नागनाथ (मो. 8087889299), कृषि विभाग पंचायत समिती वसमत (मो. 9028905357), कृषि विभाग पंचायत समिती कळमनुरी (मो. 7038473903), कृषि विभाग पंचायत समिती सेनगाव (मो. 9158121718), कृषि विभाग पंचायत समिती हिंगोली (मो. 9405323058) या कृषि विभागाच्या तक्रार नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी उत्तम वाघमारे यांनी केले आहे.

****

No comments: