28 April, 2020

हिंगोली जिल्ह्यात 03 मे पर्यंत पुर्णत: संचारबंदी


·   03 मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व व्यवहार राहणार बंद

हिंगोली,दि.28: राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याबाबतची नियमावली देखील तयार केली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी यांना (कोविड-19) नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहेत.
राज्य शासनाने दि. 17 एप्रिल, 2020 अन्वये सुधारीत अधिसुचना निर्गमीत करुन कोरोना (कोविड-19) संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सुचित केले आहे. त्यानुसार खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले होते. यामध्ये एक दिवस आड किराणा माल विक्री दुकाने, भाजीपाला विक्री करणारी दुकाने, दुध विक्री केंद्रे, परवाना असलेले चिकन/मटन शॉप, बेकरी, स्विटमार्ट संबंधीत दुकाने ठरवून दिलेल्या वेळापत्राकानुसार चालू राहतील असे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तसेच वेळापत्राकानुसार एक दिवसा आड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना खते व बि-बियाणांचा साठा करण्यासाठी तसेच शेतीसाठी उपयोगी साहित्य जसे की, ड्रीप, स्प्रिंकलर, पाईप पुरवठा, कृषि यंत्रे, औजारे, ट्रॅक्टर व त्यांचे सुटे भाग इत्यादी दुकाने व त्यांच्या दुरुस्तीचे दुकाने सुरळीत असणे आवश्यक असल्याने तसेच कृषी विषयक काम व कृषी बागायती कामासाठी लागणारी साहित्य विक्री व उत्पादन करणे, कृषि माल खरेदी विक्री केंद्र ही सर्व दुकाने व जिल्ह्यातील परवानाधारक कृषि सेवा केंद्र सुरु ठेवण्याबाबतचे देखील आदेश निर्गमीत करण्यात आले होते. जिल्ह्यातील ईलेक्ट्रीकल व स्टेशनरी साहित्याचे दुकाने एक दिवसा आड वेळापत्राकानुसार सुरु ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले होते. तसेच जिल्ह्यातील बोअरवेल मशीन चालू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली होती.
परंतू सद्यस्थितीची आपत्तकालीन परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात कोरोना विषाणुंचा प्रादूर्भावामुळे रुग्णांची संख्या ही वाढतांना दिसुन येत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील व्यवहार सुरु ठेवण्याबात देण्यात आलेली परवानगी रद्द करुन पुर्णत: प्रतिबंधीत करुन वरील सर्व आदेशातील दुकाने संस्था, व्यवहार,आस्थापना दि. 03 मे, 2020 पर्यंत पुर्णत: बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. संचारबंदीच्या कालावधीत परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्यांने बाजारामध्ये, गल्लीमध्ये घराबाहेर फिरतांना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. तसेच संबंधीतावर कारवाई करण्यात येईल, याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****

No comments: