06 April, 2020

हिंगोली जिल्ह्यात 12 एप्रिलपासून मोफत तांदुळ होणार उपलब्ध



हिंगोली (दि.6 एप्रिल): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 6 एप्रिल,2020  या सहा दिवसात हिंगोली जिल्ह्यातील 31 हजार 012 शिधापत्रिका धारकांना आजपर्यंत 6 हजार 215.21 क्विंटल अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 8.43 लाख आहेत. या लाभार्थ्यांना 797 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 23 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 12 किलो तांदूळ दिला जात आहे. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जात आहे.
तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे 4 हजार 063.83 क्विंटल गहू, 2 हजार 151.38 क्विंटल तांदूळ, तर 42.45 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 42 हजार 308 शेतकरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल,2020 मध्ये प्रति व्यक्ती 03 किलो गहु व 02 किलेा तांदुळ देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याचे आदेश केंद्र शासनाने दिलेली आहेत. त्यामुळे आता प्रत्येक प्राधान्य व अंत्योदय रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ दि. 12 एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम वाशिम कडून प्राप्त करून घेतले जात असुन दि. 12 एप्रिल पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुन मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई-
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गावामध्ये अन्नधान्य उचल केल्यावर रास्तभाव दुकानदार यांनी लॉउड स्पिकरद्वारे लाभार्थ्यांना कळवुन अन्नधान्य पुरवठा करावा, रास्तभाव दुकानदार अन्नधान्य वाटप करतांना लाभार्थ्यांना 01 मिटर अंतरावर उभे करणेसाठी मार्कीग करावी व अन्नधान्य वाटप करावे, तसेच मास्क व सॅनिटाईझरचा वापर करण्यासाठी लाभार्थ्यांना व रास्तभाव दुकानदार यांना वापर करणेसाठी सक्त आव्हान मा.जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
*****


No comments: