27 April, 2020

पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नमाज, तरावीह व इफ्तार घरातच करावे -पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे आवाहन



हिंगोली दि.27: सद्या पवित्र रमजान महिना सुरु असुन, या महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठ्या संख्येने मस्जीदमध्ये जावून तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामूळे मुस्लीम सामाजातील लोक नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. परंतू कोरोना प्रादूर्भावाच्या सद्य परिस्थितीचा विचार करता अधिक संख्येने लोक एका ठिकाणी एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. त्याकरीता मुस्लीम बांधवांनी मस्जीद, किंवा इतर सार्वजनीक ठिकाणी एकत्र न येता आपल्या घरातच नमाज, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करुन आपली आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा करणे मुस्लीम समाज बांधवाच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे नाही. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवांनी सार्वजनिकरित्या / मस्जीदमध्ये एकत्र येवून नमाज अदा न करणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लीम बांधवांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सामाजिक विलगीकरणाचे पालन पवित्र रमजान महिन्यात देखील कटाक्षाने करावे. मशिदीमध्ये नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येवू नये. तसेच घराच्या/इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमीत नमाज पठण अथवा इफ्तार करु नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमीत नमाज पठण, इफ्तार करु नये. कोणत्याही सामाजिक, धार्मीक किंवा कौटूंबीक कार्यक्रम एकत्रित येवून करु नये. सर्व मुस्लीम बांधवांनी त्याच्या घरातच नियमीत नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मीक कार्य पार पाडावे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी नियमाचे पालन करुन सहकार्य केल्यास कोरोनाचा प्रसार रोखण्यास फार मोठी मदत होणार असल्याचे ही पालकमंत्री वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
****



No comments: