09 April, 2020

संपूर्ण जिल्ह्यातील भाजीपाला व किराणा दूकाने आज सुरु राहणार -जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी




हिंगोली,दि.9: जागतीक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोव्‍हीड-19) हा विषाणू मूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषत केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथीचा रोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 रोजी पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतूदी नुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. यानुसार जीवनावश्यक वस्तु भाजीपाला व किराणा सामान खरेदी करण्याकरीता एक दिवस आड याप्रमाणे वेळापत्रक निश्चित करुन देण्यात आले होते. त्या वेळापत्रकात बदल करुन भाजीपाला व किराणा सामान खरेदी करण्याकरीता शुक्रवार दि. 10  एप्रिल, 2020 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सुरक्षेची योग्य खबरदारी घेवून सुरु ठेवण्यातकरीता परवानगी देण्यात आली होती.
परंतू वसमत शहरामध्ये एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने वसमत शहराच्या संपूर्ण सिमा बंद करण्यात आल्या आहेत. वरीलप्रमाणे निश्चित करुन दिलेली दिनांक व वेळ वसमत शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागु होणार नाही असे कळविण्यात आले होते. त्यानुसार वसमत शहरामधील जनतेला अत्यावश्यक सेवाचा पुरवठा व्हावा यासाठी सदरील शहरामधील जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला व किराणा सामानाची दुकाने सुरु ठेवणे आवश्यक आहे. त्याकरीता संपूर्ण  हिंगोली जिल्हा वसमतसह आता भाजीपाला व किराणा सामानाची दूकाने ही आज शुक्रवार दि. 10  एप्रिल, 2020 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या वेळेत सुरु ठेवता येणार आहेत.
तसेच यानंतर जिवनावश्यक वस्तु भाजीपाला व किराणा सामान खरेदी करण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमतसह सोमवार दि. 13 एप्रिल, 2020 सकाळी 9.00 ते दूपारी 1.00 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. सामान खरेदीसाठी नागरिकांना पायी जावे लागणार आहे. त्यांना दूचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांचा वापर करता येणार नाही.
 आदेशात दिलेल्या कालावधी वगळता इतर कालावधी कोणासही घराच्या बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक तसेच अपरिहार्य परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्र. 02456-222560 वर किंवा तालूकास्तरावरील नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. तसेच संचारबंदी कालावधी मध्ये परवानगी घेतलेल्या व्यक्ती शिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने बाजार मध्ये, गल्ली मध्ये घराबाहेर फिरतांना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड सहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल. तसेच संबंधीतावर कार्यवाही करण्यात येईल याची जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****


No comments: