19 April, 2020

शासकीय, खाजगी उद्योग आणि औद्योगिक संस्था आजपासून सुरु



हिंगोली, दि.19: जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे.  त्यानुसार जिल्ह्यातील औद्यागिक संस्था, कारखाने, उद्योग धंदे व तत्सम व्यवसाय करण्यासाठी वाहतुक करणारे कामगार/कर्मचारी येत असतात. यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे बंद करण्यात आले होते.
राज्य शासनाने लाकडाऊन संदर्भात नवीन सर्व समावेशक अधिसुचना जारी केली असुन यात अतिरिक्त औद्योगिक घ्ज्ञटकांसह शेती विषयक बाबी, बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सुट देण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टसींगच्या नियमाचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नगरपालीका/नगरपंचायत क्षेत्राच्या बाहेरील भागातील खालील शासकीय,  खाजगी उद्योग व औद्यागिक संस्था दि. 20 एप्रील, 2020 पासुन सुरु ठेवण्याकरीता परवानगी दिली आहे.
संबधीतांनी दि.  20 एप्रिल, 2020 पासुन उद्योगाची सुरुवात करतांना संपुर्ण जागेचे सेनिटायझेशन करुनच सुरुवात करावी. कामावर आलेल्या कामगार/खरेदीदार यांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नांव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक., कामगारांनी नेहमीच नाक आणी तोंड मास्कने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक राहणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव असलेल्या भागातून कामगारांची ने आण करण्यास मनाई असणार आहे. उद्योजकांनी आपल्या कामगाराच्या राहण्याची व जेवणांची व्यवस्था कामाच्या आवारातच करावी लागेल. दररोज कामावर येणाऱ्या व्यवस्‍थापक/कर्मचारी/कामगारांची तपासणी थर्मल गनच्या सहाय्याने करावी. उद्योजकांनी कर्मचारी/कामगारांसाठी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावेत. उद्योगधंद्याच्या परिसरामध्ये कर्मचारी/कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील यांची ही दक्षता घ्यावी. शासनाने ठरवुन दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन कार्यालयामध्ये व कार्यालयाच्या परीसरामध्ये सामाजीक अंतराचे (Social Distance) पालन करावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावावेत. 
आदेशातील अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था, अथवा समुह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल व कारवाई करण्यात येईल असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****

No comments: