27 April, 2020

हिंगोलीत नवीन पाच कोरोना बाधीत रुग्ण




·   हिंगोली जिल्ह्यात एकुण 13 कोरोना बाधीत रुग्ण ; सर्वांची प्रकृती स्थीर
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास

हिंगोली दि.27: येथील राज्य राखीव बलातील नवीन 05 जवानांचा थ्रोट स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले. येथील राज्य राखीव बलातील एकूण 12 जवानांना कोविड-19 ची लागण झाली आहे. यातील 02 जवान हे मुंबई येथे तर 10 जवान मालेगाव येथे बंदोबस्तासाठी कार्यरत होते.  तर 01 व्यक्ती जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आल्याने त्यास कोविड-19 ची लागण झाली आहे. अशाप्रकारे हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही 13 झाली आहे.
जालना येथील राज्य राखीव पोलीस दलातील कोरोना (कोविड-19) ची लागण झालेला जवान हिंगोली येथील राहत असलेल्या गावातील परिसरात व त्याच्या निकटतम संपर्कातील आलेल्या 95 व्यक्तींना आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. या सर्वांचा थ्रोट स्वॅब अहवाल तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला होता. त्यापैकी 28 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे.  यापैकी 27 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून 01 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  तर उर्वरीत अहवाल प्रलंबित आहेत.
सद्यस्थितीत हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात कोविड-19 ची लागण झालेल्या हिंगोली व जालना येथील राज्य राखीव बलातील एकूण 12 जवान तसेच जालना येथुन आपल्या गावी आलेल्या जवानाच्या संपर्कात आलेला 01 व्यक्ती असे एकूण 13 रुग्णांना येथील आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत. तसेच हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 932 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आज रोजी 602 रुग्ण भरती असून, 303 रुग्णांचा थ्रोट स्वॅब अहवाल प्रलंबीत आहे. तर 13 रुग्णांचा कोवीड-19 अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून 616 व्यक्तींचा कोवीड-19 अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. 330 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली आहे.
कोरोना विरुध्द लढ्यात हिंगोलीकरांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

****

No comments: