02 April, 2020

हिंगोली जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत एक रुग्ण तर चार संशयीत रुग्ण दाखल


हिंगोली जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत एक रुग्ण तर चार संशयीत रुग्ण दाखल
·   सर्व रुग्णांची प्रकृती स्थीर, नागरिकांनी घाबरुन जावू नये.
·   नागरिकांनी घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांचे आवाहन

हिंगोली दि.2: कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाययोजना संदर्भात हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा (कोविड-19) एक बाधीत रुग्णांस येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथील आयसोलेशन वार्डामध्ये दाखल करण्यात आले असुन त्यावर उपचार सुरु आहेत.
कोरोना बाधीत रुग्ण हा पुरुष असुन त्याचे वय 49 वर्ष आहे. या रुग्णांस दि. 31 मार्च, 2020 रोजी सकाळी 2 वाजता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. हा रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांस जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथे दाखल करुन त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या टिममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये औषधोपचार सुरु आहे. या रुग्णांचा थ्रोट स्वॅब औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर थ्रोट स्वॅब अहवाल प्राप्त झाला असून तो ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असुन, सद्यस्थीतीत कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.
तर दि. 1 आणि 2 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात चार संशयीत रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये पहिला रुग्ण एक 11 वर्षाची मुलगी असुन तिला ताप, सर्दी, खोकला आणि श्वासनाचा त्रास होत असल्याने भरती करण्यात आले आहे. तसेच दुसरा रुग्ण हा कझाकिस्तानवरुन आलेल्या आणि होम क्वॉरंनटाईन ठेवलेल्या व्यक्तीचा भाऊ असुन त्याला ताप-सर्दीचे लक्षणे असल्याने त्यास आणि तिसरा रुग्ण कझाकिस्तानवरुन आलेला व्यक्तीला भरती करण्यात आले आहे. तर चौथा संशयीत रुग्ण हा पुरुष असून त्यांचे वय 35 वर्ष आहे. हा रुग्ण कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यास भरती करण्यात आले आहे. या चार रुग्णांवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन घेतले असून, त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांमार्फत आयसोलेशन वार्डमध्ये औषधोपचार करण्यात येत आहे. तसेच या चार ही रुग्णांचे थ्रोट स्वॅब औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन, लवकरच त्यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होणार आहे. या चार ही रुग्णांची प्रकृती स्थिर असुन, सद्यस्थीतीत कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.
तसेच मालदिव येथून आलेल्या 02 नागरिकांना सद्यस्थितीत होम क्वारंनटाईन (घरातच विलगीकरण) मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत तयार करण्यात आलेल्या रॅपीड रिस्पॉन्स टिम व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत दरदिवशी या दोन्ही रुग्णांवर देखरेख ठेवून पाठपुरावा करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासन यंत्रणा ही योग्य समन्वयाने हिंगोलीकरांसाठी कार्यरत असुन, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांनी देखील घाबरुन न जाता आपली आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच सर्व सुजाण नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी आवाहन केले आहे.

****


No comments: