19 April, 2020

शासकीय-निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयामध्ये आजपासून दहा टक्के उपस्थिती




        हिंगोली,दि.19: आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशातंर्गत कोरोना विषाणूचा संसर्ग बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणुन संपुर्ण देशभरात दि. 25 मार्च, ते दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार संपुर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागु करुन सिमाबंदी करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊनच्या कालावधीत शासनाच्या कार्यालयीन आस्थापनांनी फक्त 5% कर्मचारी यांना रोटेशन पध्दतीने दैनंदीन कामकाज पार पाडण्यासाठी कार्यालयामध्ये बोला‍विण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
            परंतू कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शासनाने लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दि. 30 एप्रिल, 2020 पर्यंत वाढ करुन कांही आस्थापनांना दि. 20 एप्रिल, 2020 पासून शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थाची कार्यालयांना पुढील अटी व शर्तीच्या आधीन राहुन कामकाज सुरु करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी खालील अटी व शर्ती, राज्य शासनाच्या वेळोवेळी अद्यावत मार्गदर्शक सूचना व नियमांचे काटेकोर पालन करुन  आजपासून कार्यालये सुरु करण्यासाठी आदेश निर्गमीत केले आहेत.
यामध्ये पोलीस, होमगार्ड, नागरी सुरक्षा, अग्नीशमन, अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह आणि नगरपरिषदा/नगरपंचायती/स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींच्या सेवा कोणत्याही प्रतिबंधा शिवाय शासनाच्या सुरक्षीततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करुन सुरु ठेवता येतील. तसेच सर्व राज्य शासनाचे विभागांनी फक्त 10 टक्के कर्मचाऱ्यांना रोटेशन पध्दतीने कामावर येण्यासाठी उपस्थिती अनिवार्य करुन, त्यांच्या स्तरावरुन आदेश निर्गमीत करुन कार्यालयीन कामकाज लोकांची गैरसोय होवू नये या दृष्टीने सुरु करावीत. तसेच कर्मचारी वर्गाची सेवा 10 टक्के पेक्षा अधिक करण्याचे अधिकार संबंधित कार्यालयाच्या कामकाजाचा भार लक्षात घेऊन संबंधीत कार्यालय प्रमुखांना असतील. कार्यालय प्रमुखांनी दि. 20 एप्रिल, 2020 पासुन कार्यालयाची सुरुवात करतांना संपुर्ण कार्यालयाचे सॅनिटायजेशन करुनच सुरुवात करावी. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अधिकारी/कर्मचारी/अभ्यागतांसाठी सॅनिटायझरची सोय उपलब्ध करुन द्यावी. व प्रत्येक अधिकारी/कर्मचारी व अभ्यागंतांनी संपुर्ण वेळ मास्कचा आवश्य वापर करावा. शासनाने ठरवून दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन कार्यालयामध्ये व कार्यालयाच्या परीसरामध्ये सामाजीक अंतराचे पालन करण्यात यावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावण्यात यावे. कार्याल्याच्या परिसरामध्ये अधिकारी/कर्मचारी/अभ्यागतांच्या पिण्याच्या पाण्याची व हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करण्यात यावी व पाणी  उपलब्ध राहील याची स्वत: कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यावी. दररोज कार्यालयामध्ये येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी/अभ्यागंतांची तपासणी थर्मल गनच्या सहाय्याने करण्यात यावी. यासाठी आपल्या कार्यालयाच्या निधीमधुन  थर्मल गन उपलब्ध करुन घ्यावी किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागणी नोंदवावी.
****


No comments: